शाहीमार्ग बदलल्याने साधूंचे दर्शन दुर्लभ
By Admin | Updated: August 30, 2015 02:51 IST2015-08-30T02:51:47+5:302015-08-30T02:51:47+5:30
गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात दुसऱ्या शाही पर्वणीच्या दिवशी शाही मार्गावरील सरदार चौकात चेंगराचेंगरीची घटना घडल्याने ३० हून अधिक भाविकांचा बळी गेला होता.

शाहीमार्ग बदलल्याने साधूंचे दर्शन दुर्लभ
पंचवटी : गेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यात दुसऱ्या शाही पर्वणीच्या दिवशी शाही मार्गावरील सरदार चौकात चेंगराचेंगरीची घटना घडल्याने ३० हून अधिक भाविकांचा बळी गेला होता. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी साधू-महंत व प्रशासनाने शाही मार्गात बदल केल्याने शनिवारी झालेल्या पहिल्या शाही पर्वणीच्या दिवशी जुन्या शाही मार्गावरील भाविकांना साधू-महंतांचे दर्शन दुर्लभ झाले.
तपोवनातील लक्ष्मीनारायण मंदिराकडून सुरू झालेली शाही मिरवणूक दिगंबर आखाडा व पुढे पारंपरिक मार्गाने पंचमुखी हनुमान मंदिराकडून काट्या मारुती, लक्ष्मण झुलाकडून न नेता यावेळी श्रीराम सार्वजनिक वाचनालय गणेशवाडीतून पुढे गाडगेमहाराज पुलाखालच्या रस्त्याने रामकुंडापर्यंत नेण्यात आली. पूर्वीच्या शाही मार्गावरील काट्या मारुती, लक्ष्मण झुला, श्री काळाराम मंदिर उत्तर दरवाजा, सरदार चौक या रस्त्याने शाही मिरवणूक गेलीच नाही. शिवाय रामकुंडाकडे जाणारे सर्वच रस्ते बंद केल्याने व नागरिकांना प्रवेश नसल्याने यंदा कुंभमेळ्यात जुन्या शाहीमार्गावर राहणाऱ्या भाविकांना साधू-महंतांचे दर्शन दुर्लभ झाले. पोलीस नागरिकांना घराबाहेरही थांबू देत नसल्याने घरातच बसावे लागल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली.
सिंहस्थ शाही मिरवणुकीच्या मार्गात बदल केल्याने ज्या भागातून पहिल्यांदाच मिरवणूक गेली त्या भागातील नागरिकांनी साधू-महंतांच्या दर्शनासाठी तोबा गर्दी केली होती आणि पहिल्यांदाच मिरवणूक जवळून बघायला मिळाल्याने त्यांनी आनंद व्यक्त केला, तर दुसरीकडे जुन्या शाही मार्गावरील नागरिकांना शाही मिरवणूक तर सोडा, परंतु रामकुंडावर स्नान केल्यानंतर पुन्हा तपोवन साधुग्रामकडे जाणारे साधू-महंतही बघणे अवघड झाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली. (वार्ताहर)
निर्वाणी अनी आखाड्याचे साधू-महंत शाहीस्नान आटोपून परतीच्या मार्गाला लागले होते. खालशांची वाहने एकापाठोपाठ एक चालली होती. तेवढ्यात पुढची दोन वाहने अचानक थांबली. त्यांपैकी एका वाहनावर संतप्त झालेले एक साधूमहाशय हातातील काठी आदळत गाडी थांबवण्याची सूचना करीत होते. क्षणभर काय झाले, हे कोणालाच कळले नाही. पोलीसही चक्रावून पाहू लागले. नंतर मात्र निर्वाणी आखाड्याचे श्री महंत धरमदासजी यांचा रथ मागे राहिल्याने साधू संतप्त झाल्याचे स्पष्ट झाले. हा रथ पुढे गेल्यानंतरच अन्य वाहने रवाना झाली.