मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपींची निर्दोष सुटका आणि मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालावर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपचे नेते केशव उपाध्ये यांनी या दोन्ही प्रकरणांवरून काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
काँग्रेसवर 'दहशतवाद' आणि 'मतपेटी'चे राजकारण केल्याचा आरोपमुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सुटल्यावर सरकार सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी करत आहे, तर मालेगाव प्रकरणात आरोपींची सुटका झाल्यावर मात्र सरकार आनंद व्यक्त करत आहे. ही दोन्ही प्रकरणं काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात तपासली गेली, पण दोन्ही ठिकाणी वेगळी भूमिका घेतल्याचा आरोप उपाध्ये यांनी केला आहे.
काय आहे मुंबई आणि मालेगाव प्रकरणातील फरक?मुंबई बॉम्बस्फोट (२००६): या प्रकरणात तपास यंत्रणांनी सिमी (SIMI) या संघटनेच्या आरोपींना अटक केली होती. इंडियन मुजाहिदीनने या स्फोटांची जबाबदारी घेतली होती. मात्र, तपास यंत्रणांच्या ढिसाळ कारभारामुळे आरोपी निर्दोष सुटले, असा आरोप आता होत आहे. आता सरकार या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट (२००८): या प्रकरणाचा तपास काँग्रेस आघाडी सरकारने 'भगवा दहशतवाद' हा 'नॅरेटिव्ह' तयार करण्यासाठी केला, असा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे. त्यासाठी खोटे पुरावे तयार करून निरपराध हिंदूंना आरोपी बनवण्यात आले. ही संपूर्ण कारवाई फक्त मतांच्या राजकारणासाठी केली गेली, जेणेकरून 'भगवा दहशतवाद' ही संकल्पना समाजात रुजेल. मात्र, १७ वर्षांनंतर आता या आरोपींची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाली आहे, ज्यामुळे काँग्रेसचा खोटेपणा उघड झाला आहे, असे उपाध्ये म्हणाले.
केशव उपाध्ये यांनी काँग्रेसवर 'फेक नॅरेटिव्ह' तयार केल्याचा आरोप करत, दोन्ही बॉम्बस्फोटांमध्ये काँग्रेसने दुटप्पी राजकारण केल्याचं म्हटलं आहे.