शिवसेनेतून घाण निघून गेली, आता सगळं चांगलंच होणार - आदित्य ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 09:19 PM2022-06-25T21:19:31+5:302022-06-25T21:20:01+5:30

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे.

Dirt is gone from Shiv Sena now everything will be fine Aditya Thackeray political crisis maharashtra eknath shinde | शिवसेनेतून घाण निघून गेली, आता सगळं चांगलंच होणार - आदित्य ठाकरे

शिवसेनेतून घाण निघून गेली, आता सगळं चांगलंच होणार - आदित्य ठाकरे

googlenewsNext

राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट बनवत राज्यात राजकीय भूकंप आणला आहे. त्यामुळे शिवसेना मोठ्या संकटात सापडली असून शिंदे यांच्या बंडाचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर जोरदार निशाणा साधत शिवसेनेतून आता घाण निघून गेली, आता संगळं चांगलंच होणार असं वक्तव्य केलं. शिवसैनिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

गेले अनेक वर्ष आपण शिवसेना म्हणून एकत्र आहोत, कोणाचा डोळा असला तरी मुंबईला कोणाची नजर लागू दिली नाही. ज्यांनी सभागृहात ताकद दाखवली ते आज आमच्यासोबत आहेत. गेले दोन चार दिवस जे वातावरण आहे, त्यावरून एकच दिसतंय आता घाण निघून गेली, जे काही व्हायचं ते चांगलंच होणार, असं आदित्य ठाकरे म्हणाले. एकाच गोष्टीचं मला आश्चर्य होतं, राजकारण म्हटल्यावर लोकं कसं बदलू शकतात हे पाहिलंच आहे. पण हाच प्रश्न येतो आम्ही यांना काय कमी दिलं. कालही माझ्याकडे अनेक लोकं आले त्यांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही असं सांगितल्याचंही ते म्हणाले.

कोविडच्या कठिण काळात महाराष्ट्राला दिशा देणारा, सर्वांची काळजी घेणारा, घरातला नाव घेणारा म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाव प्रसिद्ध झाले आहे. ग्लासगोला जाताना त्यांनी सर्जरी होती तेव्हाही त्यांनी मला थांबवलं नाही. त्या ठिकाणीही त्यांचं कौतुक करण्यात आलं. राज्यासाठी आम्ही ८० हजार कोटींचे करार केले, पण आपल्याला विकण्यासाठी करार केले नाही, असंही त्यांनी नमूद केलं. 

विधान परिषदेसाठी सचिन अहिर यांना शब्द दिलाय तो पाळणार म्हणजे पाळणार. प्रत्येक शिवसैनिकाला जो शब्द दिलाय तो मी पाळणार असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. राज्यसभेसाठी राऊत यांना पाठवायचे आहे, पण संजय पवार हे सामान्य शिवसैनिक आहे. सामान्य कार्यकर्त्यांनाही आम्ही संधी दिली आहे. वर्षा बंगल्याचा आम्हाला मोह नाही. बाकीच्यांचं माहित नाही. फेसबुक लाईव्हला उशिर झाला तेव्हा त्या काळात त्यांनी आपल्याला बॅगा भरा असं सांगितलं. असा मुख्यमंत्री पुन्हा मिळणार नाही, असंही ते म्हणाले.

सगळी आपल्या जवळची माणसं, प्रेमाची माणसं निघून जातात तेव्हा आपलं काय चुकलं याचं दु:ख होतं. मी ३२ वर्षांचा माणूस राजकारणात आहे हे चुकलंय का? राजकारणाची पातळी खाली जातेय हे पाहून मी कोणाला कोणत्या तोंडानं सांगू राजकारणात या. वर्षाकडून मातोश्रीकडून येताना आम्हाला तुमचं प्रेम दिसलं. तुम्ही या जमा असं काही ठरलंही नव्हतं. आमच्या डोळ्यात अश्रू होते, काही पोलिसांच्या, सीएमओच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातही अश्रू होते हे पाहिलं असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

सचिन भाऊ तुम्ही फ्लोअर टेस्ट बद्दल सांगितलंय. ज्या दिवशी ते मुंबईत उतरतील, एअरपोर्टकडून विधानभवनाकडे जाण्याचे रस्ते वरळीतून आहे, नाहीतर आपल्या परळ मधून आहेत. तिसरा रस्ता आपल्या भायखळ्यातून आहे आणि येणार आपल्या वांद्र्यामधून असं सूचक वक्तव्यही त्यांनी बोलताना केलं. 

Web Title: Dirt is gone from Shiv Sena now everything will be fine Aditya Thackeray political crisis maharashtra eknath shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.