“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 19:31 IST2025-12-21T19:27:51+5:302025-12-21T19:31:04+5:30
Deputy CM Eknath Shinde News: विकास हाच अजेंडा ठेवा. विरोधकांच्या आरोपांना कामातून उत्तर द्यायचे आहे. गाफील राहू नका. मनपा निवडणुकीसाठी कामाला लागा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: नगरपालिका व नगर परिषद निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला एकत्रित मिळालेल्या जागांपेक्षा अधिक जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. नवी मुंबईत शिवसेनेची ताकद वाढत असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे गाफील न राहता सर्वांनी एकदिलाने कामाला लागावे आणि नवी मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
नवी मुंबई येथे आयोजित शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या निवडणुकांमध्ये ‘असली शिवसेना कोणाची’ याचा फैसला जनतेने केला आहे. महाविकास आघाडीचा एकत्रित आकडा सिंगल डिजिटमध्ये राहिला, तर शिवसेनेचा आकडा त्यापेक्षा अधिक आहे. लोकसभा, विधानसभा आणि नगरपालिका निवडणुकांनंतर आता महापालिकेतही महायुतीचाच भगवा फडकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महापालिका निवडणुकीत शाखा-शाखांमधून काम करा, नाराजी असल्यास संवादातून ती सोडवा आणि विकास हाच अजेंडा ठेवा. आरोपांना उत्तर कामातून द्यायचे आहे. गाफील राहू नका, असा संदेश देत त्यांनी कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन केले.
जो काम करेल तोच पुढे जाईल
शिवसेना हा मालक-नोकरांचा नव्हे, तर कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. जो काम करेल तोच पुढे जाईल, असे ठामपणे सांगत त्यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. शिवसेना आता केवळ मुंबई-ठाण्यापुरती मर्यादित नसून चांदा ते बांधापर्यंत पोहोचली असल्याचे त्यांनी नमूद केले. नवी मुंबईसाठी अडीच वर्षांच्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. सिडकोची घरे, एफएसआय वाढ, टोल नाके हटवणे, पूल व रस्ते प्रकल्प, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, ‘तिसरी मुंबई’ ग्रोथ सेंटर यांसारखे प्रकल्प नवी मुंबईसाठी गेम चेंजर ठरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, लाडकी बहीण योजना, लखपती योजना, एसटी प्रवास सवलत, उच्च शिक्षण मोफत, शेतकरी सन्मान योजना यांचा उल्लेख करताना “कोई माई का लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही,” असे ठाम आश्वासन त्यांनी दिले. नवी मुंबईची ही निवडणूक शहराच्या विकासाचा आणि पुढील पिढ्यांच्या भवितव्याचा निर्णय करणारी असल्याने सर्वांनी एकदिलाने काम करून महायुतीचा विकासाचा भगवा फडकवावा, असे आवाहन करत त्यांनी भाषणाचा समारोप केला.