“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:17 IST2026-04-12T14:14:46+5:302026-04-12T14:17:07+5:30
Deputy CM Eknath On Asha Bhosle Sad Demise: आशाताई ऐहिकदृष्ट्या आपल्यात नाहीत ही जाणीव पचविणे अवघड आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
Deputy CM Eknath On Asha Bhosle Sad Demise: प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. सोमवारी १३ एप्रिल रोजी संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील. बॉलिवूडमधील संगीतकार, गायक, सेलिब्रिटी, राजकीय वर्तुळातील मंडळी आशा भोसले यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त करत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत आशाताईंना आदरांजली वाहिली.
गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाने गेल्या चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा, आणि मनामनांना एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला आहे. आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही, असा दिवस गेल्या अनेक दशकांत उजाडला नाही, आणि मावळलाही नाही. या स्वराने असंख्य क्षण फुलविले, आणि फुलवत शकुनाच्या मेंदीने रंगलेले जगण्याचे असंख्य क्षण हसविलेदेखील. आशाताई ऐहिकदृष्ट्या आपल्यात नाहीत ही जाणीव पचविणे अवघड आहे, पण त्या स्वरांची सोबत मात्र कायम राहणार आहे. कारण या स्वरांचा साज कालातीत आहे. अनेक वेळा आशाताईंनी भेटण्याचे भाग्य मला लाभले, ते अविस्मरणीय क्षण कायमस्वरूपी माझ्या मनात अजरामर राहतील. आशाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभावी, ही ईश्वरचरणी प्रार्थना. आम्ही संपूर्ण शिवसेना परिवार त्यांच्या कुटुंबियांच्या आणि चाहत्यांच्या दुःखात सहभागी आहोत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
आशाताईंनी भारतीय संगीताला जगात पोहोचविले : गडकरी
आशाताई आणि माझा अतिशय जवळचा संबंध होता. दोन-तीन महिन्यांअगोदरच आमची भेट झाली होती. त्या थकल्या होत्या, मात्र उत्साह कायम होता. संगीतक्षेत्रात लतादीदींप्रमाणेच आशाताईंनीदेखील भारतीय संगीताला जगात पोहोचविले. त्यांनी सर्व प्रकारची गीते गायली. स्व.सुरेश भट यांनी लिहीलेले ‘केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली’ हे गाणे तर त्यांनी अजरामर केले. आशाताईंनी अनेक भाषांतून अनेक गीते गायली. त्यांची गाणी भविष्यात अनेक वर्ष सर्वांच्याच स्मरणात राहतील. माझ्या एकसष्टीच्या कार्यक्रमात त्यांनी गीत गाऊन मला आशीर्वाद दिले होते. वैयक्तिकरित्यादेखील माझी हानी झाली आहे. हे दु:ख सहन करण्याची आशाताईंच्या कुटुंबियांना ईश्वर शक्ती देवो हीच प्रार्थना आहे, असे सांगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला.
दरम्यान, आशाताईंच्या आवाजात रोमॅन्स, विरह, खट्याळपणा आणि गझलेची नजाकत एकाच वेळी अनुभवायला मिळत होती. त्यांचा आवाज म्हणजे भारतीय संगीतविश्वाचा एक अमर ठेवा आहे. गेल्या ८ दशकांहून अधिक काळ आपल्या सुरेल, बहुआयामी आणि जादुई आवाजाने कोट्यवधी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हा स्वर आज कायमचा शांत झाला आहे.
गानसम्राज्ञी आशा भोसले यांच्या दुःखद निधनाने गेल्या चार पिढ्यांची मने संगीताच्या बहरात चिंबचिंब करणारा, आणि मनामनांना एका चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला आहे. आशाताईंचा स्वर कानावर पडला नाही, असा दिवस गेल्या अनेक दशकांत उजाडला नाही, आणि मावळलाही नाही. या… pic.twitter.com/Y0lQV89HcU
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) April 12, 2026