सर्व अवैध बांधकामे पाडल्यास घरं खाली करू - कॅम्पा कोलावासी
By Admin | Updated: June 12, 2014 19:51 IST2014-06-12T13:36:08+5:302014-06-12T19:51:18+5:30
मुंबईतील सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्यात यावीत, अवैध बांधकामांना संरक्षण देऊ नये,या अटी मान्य झाल्यास आपण घराच्या चाव्या सुपूर्त करू, अशा आशयाचे पत्र कॅम्पाकोलावासियांनी पालिकेला पाठवले आहे.

सर्व अवैध बांधकामे पाडल्यास घरं खाली करू - कॅम्पा कोलावासी
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १२ - मुंबईतील सर्व अनधिकृत बांधकामे पाडण्यात यावीत, अवैध बांधकामांना संरक्षण देऊ नये,या आणि अशा अनेक अटी मान्य झाल्यास आपण घराच्या चाव्या सुपूर्त करू, अशा आशयाचे पत्र कॅम्पाकोलावासियांनी पालिकेला पाठवले आहे. घराच्या चाव्या सुपुर्त करण्याची मुदत संपत आल्यानंतरही चाव्या पालिकेला न देण्याचा कॅम्पाकोलावासियांचा निर्णय ठाम असून त्यांनी गुरूवारी मुंबई महानगरपालिकेला नव्या अटींचे पत्र पाठवले आहे.
मुंबईत अन्यत्र असलेली बेकायदा बांधकामे प्रथम पाडण्यात यावीत, तसेच आतापर्यंत या घरांमध्ये राहणा-या लोकांकडून वसूल करण्यात आलेली दंडाची रक्कम परत करण्यात यावी, अवैध बांधकामांना संरक्षण देऊ नये, आपल्या संमतीशिवाय पुनर्वसन करू नये अशा अनेक अटी या पत्रात आहेत. या पत्रावर महानगरपालिका आयुक्तांनी स्वाक्षरी केली तरच आपण घराच्या चाव्या पालिकेच्या अधिका-यांना देऊ, अशी भूमिका कॅम्पाकोलामधील रहिवाशांनी घेतली आहे
महापालिकेने कॅम्पा कोलाच्या रहिवाशांना दिलेली ७२ तासांची मुदत गुरुवारी सायंकाळी ५ वाजता संपत असून शुक्रवारी (१३ जून) कॅम्पा कोलावर हातोडा पडणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या कारवाईपासून बचाव व्हावा म्हणून कॅम्पा कोलावासीय अजूनही हातपाय मारत आहेत. ते सातत्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेटही घेत आहेत. घर वाचवण्याचा आणखी एक प्रयत्न म्हमून त्यांनी महानगरपालिकेला हे पत्र लिहीले आहे.