छत्रपती संभाजीनगर - ‘व्यवहाराच्या पैशांची मागणी केली म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही’, असे निरीक्षण नोंदवित मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या. विभा कंकणवाडी आणि न्या. संजय देशमुख यांनी नुकताच ४ अर्जदारांविरुद्ध ‘आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत’ दाखल गुन्हा रद्द केला.
मयत गजानन गोरे यांनी अनेक कंपन्यांकडून माल उचलून पैसे दिले नाहीत. त्यामुळे करण्यात आलेल्या पैशाच्या मागणीमुळे त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवित वरीलप्रमाणे आदेश दिला.
अर्जदारांतर्फे प्रतिपादनमयत गजानन यांनी ८ ते १० व्यक्तींना विषारी औषध पित असलेला फोटो पाठवून ‘तुम्ही पैशाची मागणी करत असल्यामुळे मी आत्महत्या करत आहे’ असा मेसेज पाठविला व विषारी औषध घेऊन आत्महत्या केली, असे अर्जदारांतर्फे निदर्शनास आणून देण्यात आले. ३ अर्जदारांनी ॲड. आनंदसिंह बायस यांच्यातर्फे याचिका दाखल केल्या होत्या. बायस यांच्या वतीने ॲड. पृथ्वीराजसिंह बायस यांनी युक्तिवाद केला. त्यांना शेख अबदुला व ॲड. रजत उंटवाल यांनी सहकार्य केले.