Deepali Chavan Suicide Case: रेड्डींचा बदलीला विरोध, म्हणतात... बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 05:51 AM2021-03-29T05:51:05+5:302021-03-29T05:51:43+5:30

Deepali Chavan Suicide Case: वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी नागपूर येथे मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी बदली रद्द करण्यासाठी वनखात्याला पत्र लिहिले आहे.

Deepali Chavan Suicide Case: Reddy opposes transfer, says ... transfer is not based on natural justice | Deepali Chavan Suicide Case: रेड्डींचा बदलीला विरोध, म्हणतात... बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही

Deepali Chavan Suicide Case: रेड्डींचा बदलीला विरोध, म्हणतात... बदली नैसर्गिक न्यायतत्त्वाने नाही

googlenewsNext

अमरावती : वनपरिक्षेत्राधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी नागपूर येथे मुख्यालयात उचलबांगडी करण्यात आलेले अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक एम. एस. रेड्डी यांनी बदली रद्द करण्यासाठी वनखात्याला पत्र लिहिले आहे. माझी कोणतीही चौकशी न करता तडकाफडकी बदली करणे, हे नैसर्गिक न्यायाला धरून नाही. त्यामुळे पुनर्विचार करून बदली रद्द करावी, असे रेड्डी यांनी पत्रात म्हटले आहे. राज्य सेवेतील एका अतिरिक्त मुख्य सचिवाच्या जोरावर त्यांची मुजोरी सुरू असल्याची चर्चा आहे.

दीपाली यांच्या सुसाईड नोटनुसार रेड्डी यांच्यावरही संशयाची सुई आहे. परिणामी वन मंत्रालयातील मुख्य वनसंरक्षक अरविंद आपटे यांनी २६ मार्च रोजी रेड्डी यांना अमरावती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावरून नागपूर येथील प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) यांच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, मेळघाट व्याघ्र प्रकल्पात बस्तान बसवलेल्या रेड्डी यांना बदली नको आहे. मार्च एन्डला बदली कशी, असे प्रश्नचिन्ह त्यांनी उपस्थित केले आहे.   

रेड्डी यांचा विदर्भातील कार्यकाळ
 रेड्डी हे सन २००७ ते २००९ पर्यंत अकोट वन्यजीव विभागात उपवनसंरक्षक पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांची पेंच व्याघ्र प्रकल्पात बदली झाली. मुख्य वनसंरक्षकपदी बढती मिळाल्यानंतर २०१७ मध्ये ते मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालकपदी रुजू झाले. 
 या प्रकल्पाचे क्षेत्रसंचालकपद हे राज्यातील इतर पाच व्याघ्र प्रकल्पांप्रमाणे मुख्य वनसंरक्षक दर्जाचे पद आहे. गत पाच वर्षांत रेड्डी यांनी पश्चिम विदर्भातील अभयारण्य काबीज केले. 

 आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक पदावर बढती मिळाल्यानंतरही नागपूर, पुणे, मुंबई येथे न जाता त्यांनी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकपद अमरावती येथे निर्माण करून घेतले. केंद्र व राज्य शासनाची परवानगी न घेता मंत्रालयातील अतिरिक्त मुख्य सचिवाच्या बळावर अमरावती विभाग स्तरावर हे पद निर्माण करण्याची किमया रेड्डी यांनी केली आहे.  

बदलीला विरोध का?
रेड्डी यांना व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यातील खडान्‌खडा माहिती आहे. वनसंवर्धन अधिनियम १९८० च्या कायद्याचा रेड्डी यांनी भंग केला आहे. जेसीबी व अन्य यंत्राच्या साह्याने मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कारंजाचे सोहळ अभयारण्य, लोणार सरोवर, बुलडाणा येथील ज्ञानगंगा, यवतमाळचे टीपेश्वर, अकोला येथील पैनगंगा या अभयारण्यात पर्यटनाच्या नावाखाली संरक्षित क्षेत्रात जेसीबीने रस्ते, इमारती उभ्या केल्या आहेत. याप्रकरणाची चौकशी होऊ नये, यासाठी ते बदलीला विरोध करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पत्र अद्याप प्राप्त नाही
एम.एस. रेड्डी यांनी पाठविलेले पत्र अद्याप मला प्राप्त झालेले नाही. मात्र, रेड्डी यांचा कार्यभार अमरावतीचे मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने शासन आदेशाची कार्यवाही पूर्णत्वास आलेली आहे. रेड्डींनी पत्रात काय म्हटले, याबाबत शासनाला कळवले जाईल.
-पी. साईप्रसाद, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल) नागपूर
 

Web Title: Deepali Chavan Suicide Case: Reddy opposes transfer, says ... transfer is not based on natural justice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.