लग्न मंडपातच 27 वर्षीय नवरदेवाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 22:08 IST2017-08-12T13:16:48+5:302017-08-12T22:08:45+5:30
लग्नाच्या मंडपातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मिरजेत घडली

लग्न मंडपातच 27 वर्षीय नवरदेवाचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू
सांगली, दि. 12 - लग्नाच्या अक्षतांना केवळ तीन तास राहिले असतानाच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी सकाळी मिरजेत घडली. रवींद्र मदन पिसे (वय २७, रा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर, मिरज) असे या नवरदेवाचे नाव आहे. हृदविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे वधू आणि वराकडील नातेवाईकांना जबरदस्त मानसिक धक्का बसला आहे.
मिरजेतील रवींद्रचा विवाह कसबा बावडा (जि. कोल्हापूर) येथील तरुणीसोबत ठरवण्यात आला होता. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता हळदी समारंभ पार पाडला. शनिवारी मिरजेतील टाकळी रस्त्यावरील शाही दरबार हॉलमध्ये पावणेबाराच्या मुहूर्तावर विवाह होणार होता. सकाळी व-हाडासह सर्व नातेवाईक मंगल कार्यालयामध्ये दाखल झाले होते.
रवींद्र त्याच्या घरी विवाहाची तयारी करीत होता. तयारी पूर्ण झाल्यानंतर तो सकाळी साडेआठ वाजता मित्र व नातेवाईकांसोबत शाही दरबार हॉलमध्ये निघाला होता. त्यावेळी छातीत अचानक दुखू लागल्याने तो रस्त्यावर कोसळला. मित्र व नातेवाईकांनी त्याला तातडीने उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले. 9 वाजण्याच्या दरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत झाल्याचे घोषित केले. मंगल कार्यालयात वधू आणि वराकडील मंडळी लग्नाच्या तयारीत होते. सनई-चौघड्याचे सूर निघत होते. भोजनाचीही तयारी सुरु होती. तोच नवरदेवाचा मृत्यू झाल्याचे वृत्त येऊन धडकताच सर्वांना धक्का बसला. त्यांना शोक अनावर झाला.