दारूबंदी मागणार्यांवर दंडुकेशाही!
By Admin | Updated: May 28, 2014 09:47 IST2014-05-28T09:47:19+5:302014-05-28T09:47:36+5:30
अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीवरुन पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या बाचाबाची, मारहाणीनंतर पोलिस मुख्यालयातून आलेल्या शेकडो पोलिसांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केली

दारूबंदी मागणार्यांवर दंडुकेशाही!
>पोलिसांची महिलांनाही मारहाण : ५0हून अधिक गंभीर जखमी
उस्मानाबाद : अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीवरुन पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये झालेल्या बाचाबाची, मारहाणीनंतर पोलिस मुख्यालयातून आलेल्या शेकडो पोलिसांनी ग्रामस्थांना बेदम मारहाण केली. अक्षरश: घराचे दरवाजे तोडून त्यांना बाहेर काढत हाती लागेल त्या युवक-वृद्धास झोडपण्यात आले. या मारहाणीत ५0 हून अधिक ग्रामस्थ गंभीर जखमी झाले. दरम्यान, ग्रामस्थांनी केलेल्या मारहाण, दगडफेकीत पोलीस अधिकार्यासह सात ते आठ कर्मचारी जखमी झाले. ही घटना कनगरा गावात सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. बेंबळी पोलीस ठाण्यात १३५ जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रामस्थांसह बचत गटाच्या महिलांनी एक वर्षापासून कनगरा गावातील अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी पोलिसांकडे लावून धरली होती. मात्र, पोलिसांनी गावात दारुविक्री होत नसल्याचा दावा करीत, अशी दारुविक्री होत असेल तर तुम्हीच दारू पकडून द्या, आम्ही कारवाई करतो, असे सांगितले. त्यामुळे संतप्त महिला, ग्रामस्थांनी सोमवारी रात्री दारूविक्रेत्यासह मुद्देमाल पकडून दिला.त्यानंतर गावात आलेले पोलीस आणि ग्रामस्थांमध्ये दारू सांडल्याच्या कारणावरून बाचाबाची झाली. त्याचवेळी एका महिलेस पोलिसांनी मारहाण केली. त्यानंतर संतप्त जमावाने पोलिसांना मारहाण केली.
गावकर्यांबरोबर झालेल्या या संघर्षाची माहिती मिळताच पोलीस निरीक्षकांसह कर्मचारी गावात दाखल झाले. या फौजफाट्याला ग्रामस्थांच्या दगडफेकीचा सामना करावा लागला. ही घटना कळताच पोलिस मुख्यालयातून शेकडो पोलिस कर्मचार्यांचा फौजफाटा गावात दाखल झाला. पोलिसांनी काही घरांची दारे तोडून आतमध्ये प्रवेश केला. दिसेल त्याला काठीने बेदम मारहाण केली.यातून महिला, वृद्धही सुटले नाहीत. पोलिसांची दहशत पाहता अनेकांनी रात्रीतूनच गावातून पळ काढला. पहाटेपर्यंत पोलिसांची ही ‘कनगरा कोंम्बींग’ कारवाई सुरू होती. पोलिसांनी ८ महिलांसह ५४ जणांना अटक केली आहे. याप्रकाराचा सर्वत्र निषेध होत आहे.
गृहराज्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
कनगरा येथे पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीची दखल राज्याच्या गृहविभागाने घेतली आहे. या प्रकरणी सखोल चौकशीचे आदेश गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिले आहेत. कनगरा येथील सदर घटनेची पोलीस महासंचालकांमार्फत चौकशी करण्यात येईल, त्यानंतर दोषी अधिकारी, कर्मचार्यांविरुद्ध कारवाई करण्याची ग्वाही गृहराज्यमंत्री पाटील यांनी दिली.
राज्यभरातून निषेध
च्कनगरा येथे पोलिसांनी केलेल्या अमानुष मारहाणीचा राज्यभरातून निषेध करण्यात आला आहे. विरोधी पक्षनेते विनोद
तावडे, पालकमंत्री मधुकरराव चव्हाण, माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील, शिवसेनेचे आ. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी ग्रामस्थांची भेट घेऊन या घटनेचा निषेध केला.
रडणार्या महिला अन् साहित्याची नासधूस
च्मंगळवारी सकाळी कनगरा गावात पाऊल ठेवताच महिलांसह लहान मुलांच्या डोळ्यांतील अश्रू पोलिसांची निर्दयी कारवाई व्यक्तकरीत होते. पोलिसांनी घरात घुसून पुरुषांबरोबरच महिलांना बेदम मारहाण केली. यातून चिमुरडीही सुटली नाहीत. गावातील अनेक घरांचे दरवाजे तुटून पडले तर अनेक घरातील खुच्र्या, साहित्याचीही मोठय़ा प्रमाणात नासधूस झाली.