राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब
By Admin | Updated: August 15, 2016 04:31 IST2016-08-15T04:31:33+5:302016-08-15T04:31:33+5:30
राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालयांच्या क्षेत्रात ‘सायबर लॅब’ सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सायबर लॅब
मुंबई : वाढत्या सायबर गुन्ह्यांवर वचक ठेवतानाच अशा गुन्ह्यांची तात्काळ उकल करुन आरोपींना जेरबंद करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालये आणि पोलिस आयुक्तालयांच्या क्षेत्रात ‘सायबर लॅब’ सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार आज १५ आॅगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी, एकाच दिवशी राज्यातील ४४ ठिकाणी या सायबर लॅबचे उद्घाटन केले जाणार आहे, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत महाराष्ट्र सायबर कार्यालयाचे उद्धघाटन केले जाणार आहे.
माहिती तंत्रज्ञानाचा झपाट्याने विस्तार होत आहे. ई-बँकिंग, पेपरलेस कार्यालय, सोशल मीडिया आदींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आधुनिक तंत्रज्ञानाने सामान्य माणसाचे आयुष्य व्यापलेले असताना सायबर गुन्हेही वाढले आहेत. सायबर गुन्ह्यांना आळा घालण्याबरोबरच हे गुन्हे करणाऱ्यांना वचक बसावा, यासाठी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्प उभारण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्हा मुख्यालये आणि पोलीस आयुक्तालय क्षेत्रात ‘सायबर लॅब’ उभारण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. सर्व जिल्हे, पोलीस आयुक्तालयांसह मुंबई, पुणे आणि नागपूर रेल्वे कार्यक्षेत्रात ४४ विविध ठिकाणी ‘सायबर लॅब’ची उभारणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)