मुंबई : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. येत्या दीड ते दोन महिन्यांत उर्वरित गावांची मोजणी करून भूसंपादनाचे काम सुरू केले जाणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
या प्रकल्पासाठी ८६,३०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य सरकारने त्यासाठी २० हजार कोटींची तरतूद केली आहे. सध्या कोल्हापूर वगळता ११ जिल्ह्यांतील ३०९ गावांत मोजणी सुरू आहे. ऑगस्टपर्यंत मोजणी पूर्ण करून डिसेंबरअखेरपर्यंत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
या जिल्ह्यांतून मार्ग प्रस्तावित
वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सिंधदुर्ग हे १२ जिल्हे जोडले जातील.
या प्रकल्पातील ९२ गावांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. हा प्रकल्प बीओटी, ॲन्युटी किंवा अन्य कोणत्या पद्धतीने राबवायचा याबाबत अभ्यास सुरू आहे, असे एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी सांगितले.