निवडणूक आयोग आणि भाजपाने संगनमताने मतचोरी करून निवडणुकीत विजय कसा मिळवला याचा पर्दाफाश राहुलजी गांधी यांनी केल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने या मतचोरीविरोधात "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" ही स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे.
पुण्याच्या खडकवासला येथील शिबिर स्थळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गट नेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, CWC सदस्य नसीम खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत, माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वाक्षऱ्या करून या मोहिमेचा शुभारंभ केला.
यावेळी, काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळेत दुसऱ्या दिवशी ‘सोशल मीडिया’ या विषयावर सुप्रिया श्रीनेत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील पाच महिन्यात मतदारांची संख्या कशी वाढली याची माहिती दिली तसेच मतचोरी कशी करण्यात आली हे राहुल गांधी यांनी केलेली पोलखोल दाखवली. २००४ ते २०२४ च्या दरम्यान झालेल्या सर्व निवडणुकातील मतदारसंख्या व झालेले मतदान यांची आकडेवारीसह माहिती दिली. आज मुख्य प्रवाहातील प्रसार माध्यमांवर भाजपाने कब्जा करून ठेवला आहे आणि काँग्रेसला प्रसिद्धी खूप कमी दिली जाते अशा परिस्थितीत सोशल मीडिया हेच महत्वाचे साधन ठरत आहे असे त्यांनी सांगितले.