Maharashtra Election 2019: राज्यात आघाडीच्या २४ जागाच येतील - मुख्यमंत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 06:34 IST2019-10-14T06:34:19+5:302019-10-14T06:34:57+5:30
बंडखोराचे डिपॉझिट जप्त होण्याचा दावा Maharashtra Election 2019:

Maharashtra Election 2019: राज्यात आघाडीच्या २४ जागाच येतील - मुख्यमंत्री
मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या या वेळी राज्यात एकूण २४ जागाच येतील, अशी भविष्यवाणी करून येत्या २४ तारखेला राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्सोवा येथे रविवारी झालेल्या सभेत व्यक्त केला.
आमची महायुती ही छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारी आहे. त्यामुळे बंडखोरी करणाऱ्या गद्दारला येथील जनता कदापि थारा देणार नाही. जनताच येथील बंडखोर उमेदवाराला त्याची जागा दाखवून देईल. बंडखोराचे डिपॉझिट जप्त होऊन पुन्हा भारती लव्हेकरच मोठ्या मताधिक्याने विजयी होतील,
असा ठाम विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवार डॉ. भारती लव्हेकर यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची महाजनादेश संकल्प सभा येथील चित्रकूट मैदानात आयोजित केली होती. या सभेत मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधी व शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. आमच्या समोर निस्तेज विरोधी पक्षाचे आव्हानच नाही, याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
पाच वर्षांत महायुतीच्या सरकारने राज्यात नेत्रदीपक कामगिरी केली. आघाडीच्या सरकारच्या काळापेक्षा आमची कामे दुप्पट आहेत.
मुंबईतील मेट्रोचे जाळे, ट्रान्स हार्बर, वांद्रे-वर्सोवा सी-लिंक, कोस्टल रोड
या प्रकल्पांमुळे मुंबई अधिक गतिमान
होणार असून मुंबईकरांचे जीवन सुसह्य बनेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
या वेळी मंचावर मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, शिवसंग्रामचे
राष्ट्रीय अध्यक्ष विनायक मेटे, भाजप
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य रघुनाथ कुलकर्णी, भाजप प्रदेश सचिव संजय
पांडे, उमेदवार डॉ. भारती लव्हेकर आदी उपस्थित होते.