बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची चपराक
By Admin | Updated: July 31, 2016 04:48 IST2016-07-31T04:48:47+5:302016-07-31T04:48:47+5:30
बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला कोंडीत पकडून काँग्रेसने मोठी चपराक दिली आहे.

बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची चपराक
सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादीचे कृषी सभापती शिवाजीराव शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीनेच अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठरावासाठी बोलविण्यात आलेल्या विशेष सभेला राष्ट्रवादीचे केवळ ३६ सदस्यच उपस्थित राहिले. तसेच खासदार उदयनराजे समर्थक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखे यांच्यासह राष्ट्रवादीचे तीन सदस्य आणि काँग्रेस सर्व सदस्य अनुपस्थित राहिल्याने पीठासन अधिकारी अमृत नाटेकर यांनी हा ठराव नामंजूर केला. यामुळे बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला कोंडीत पकडून काँग्रेसने मोठी चपराक दिली आहे.
सातारा जिल्हा परिषदेत ६६ सदस्य आहेत. हा ठराव मंजुरीसाठी दोन तृतीयांश म्हणजे ४४ सदस्यांची आवश्यकता होती. दरम्यान, अविश्वास ठराव नामंजूर झाल्यामुळे अविश्वास ठराव जिंकता न आल्याने राष्ट्रवादीवर नाचक्की ओढावली असून, बालेकिल्ल्यात अवस्था पसरली आहे. यावेळी शिवाजीराव शिंदे आणि काँग्रेस समर्थकांनी जिल्हा परिषदेच्या बाहेर फटाके फोडून आनंद साजरा केला.
सभापतीवर अविश्वास ठराव आणण्याची सातारा जिल्हा परिषदेच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी हा अविश्वास ठराव जिंकण्यासाठी पूर्ण ताकत पणाला लावली होती, तर दुसरीकडे काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादीला हा अविश्वास ठराव कोणत्याही परिस्थितीत जिंकू द्यायचा नाही यासाठी राष्ट्रवादीचे सभापती शिवाजीराव शिंदे यांच्या पाठीमागे काँग्रेसची ताकत पणाला लावली होती. अखेर राजकीय पटलावरील खेळात आमदार जयकुमार गोरे यशस्वी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. (प्रतिनिधी)
>उदयनराजेंच्या समर्थकांनी व्हीपही धुडकावला!
राष्ट्रवादीच्या चिन्हावर निडून आलेले खासदार उदयनराजे समर्थक जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रवी साळुंखेसह तीन सदस्य व्हीप बजावूनही अनुपस्थित राहिले, तर काँग्रेसच्या सर्व १८ सदस्यांनी सभागृहात न येता गैरहजर राहणे पसंत केले.