Congress Harshwardhan Sapkal: जगाच्या पोशिंद्याला शिवीगाळ करणे हा विकृतीचा कळस आहे. भाजपाचे माजीमंत्री बबनराव लोणीकर यांची ही मुजोरी सहनशिलतेच्या पलिकडे गेली आहे. बळीराजाला शिव्या देऊन त्यांचा अपमान करणाऱ्या लोणीकरांनी प्रायश्चित करावे, नाहीतर पळता भुई थोडी करू असा इशारा देत, पोशिंद्याचा बाप काढणारे लोणीकर कोण, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
पारावर बसणारे काही तरुण लिहितात की, गावातील ९-१० लोक माझ्या दावणीला बांधलेले आहेत. ते मोदी-फडणवीसांचे अंधभक्त आहेत. हे लोक विचारतात की, मोदींनी काय दिलं? फडणवीसांनी काय दिलं? आणि आमदाराने काय दिलं? गावात जे काही मिळालं ते गेल्या २५ वर्षांत मीच दिलं. ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का? असे विधान बबनराव लोणीकर यांनी केले होते. यावरून आता राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत.
नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपा नेत्यांचा भ्रम
प्रसार माध्यमांशी बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, भाजपा कोणत्या विचारसरणीचा पक्ष आहे हे सातत्याने उघड होत आहे. एक भाषा, एक धर्म, एक नेता हा त्यांचा हट्ट आहे आणि आम्हीच सर्वकाही आहोत हा दर्शवणारा घृणास्पद प्रकार आहे. जनतेच्या मतातून सरकार स्थापन होते व जनतेच्या पैशातूनच योजना राबिवल्या जातात. सरकार शेतकऱ्यांना काही देते म्हणजे उपकार करत नाही. नरेंद्र मोदीच सर्व देतात हा लोणीकर सारख्या लोकांचा भ्रम आहे. शेतकऱ्याचा बाप काढणे हा संतापजनक प्रकार आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांनेही आधी शेतकऱ्याला भिकारी म्हणून अपमान केला होता, अशी टीका सपकाळ यांनी केली.
दरम्यान, राजकीय पक्षांचे गाव पातळीवरील काही कार्यकर्ते गावात आहेत. ते पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना ट्रोल करतात. मी त्यांच्याबाबतीत बोललो. आमची भाषा खेड्यातील आहे. आम्ही वडिलांना बाप आणि आईला माय म्हणतो. एखाद्या मुलाने काम केले नाही, तो नीट शिकला नाही, तर आम्ही त्याला कार्ट म्हणतो. ही आमची बोलीभाषा आहे. मी माझ्या ग्रामीण भाषेत बोललो. मी मागील ४० वर्षांत केव्हाही सर्वसाधारण माणूस किंवा शेतकऱ्यांविरोधात बोललो नाही. मी नेहमी त्यांच्याबाजूने उभा राहणारा माणूस आहे. काही राजकारणी माझ्या विधानाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता जनार्दन माझी माय-बाप आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी २५ वर्षांपासून निवडून येत आहे. त्यामुळे माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गरीब माणूस किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही. मी शेतकऱ्यांची एकदा काय हजारवेळा माफी मागेल. पण, मी त्यांच्याविषयी काहीही चुकीचे बोललो नाही. मला त्यांच्याविषयी आदर वाटतो, असे स्पष्टीकरण बबनराव लोणीकर यांनी वाद वाढल्यानंतर दिले.