अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 05:55 IST2025-06-03T05:54:19+5:302025-06-03T05:55:15+5:30
अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया मदत केंद्राने केली असता मोबाइलवर ओटीपी येत नसल्याच्या तक्रारी

अकरावी प्रवेशाचा गोंधळ अजून सुरूच; ५ जूनपर्यंत मुदतवाढ! फ्रेशरचीही रिपीटर म्हणून नोंद
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात सुमारे ११ लाख विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केली असून त्यात मुंबई विभागातील २ लाख ६५ हजार ९०० अर्जदारांचा समावेश आहे. दरम्यान्या प्रक्रियेत सोमवारी दुपारपर्यंत ९२ तक्रारींची नोंद झाली असून, त्यातील ८५ टक्के तक्रारींचे निराकरण झाले आहे. उर्वरित १५ टक्के तक्रारींमध्ये ओटीपी न मिळणे, रिपीटर विद्यार्थ्यांना फ्रेशर आणि फ्रेशर विद्यार्थ्यांना रिपीटर म्हणून नोंद करणे, नाव व शैक्षणिक वर्ष वेगळे, मात्र सीट नंबर एकच असणे, आदी तक्रारींचा समावेश आहे.
तक्रारी लक्षात घेऊन या प्रवेश प्रक्रियेला ५ जूनपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाचे संचालक श्रीराम पानझडे यांनी जाहीर केला. प्रवेश प्रक्रियेमध्ये कांदिवलीची मेघना पांचाळ या फ्रेशर विद्यार्थिनीची रिपीटर म्हणून नोंद झाली. अशा विद्यार्थ्यांचा अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया मदत केंद्राने केली असता त्यांना मोबाइलवर ओटीपी येत नसल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत.
विभागवार नोंदणी
- पुणे १,८७,९२५
- मुंबई २,६५,९००
- कोल्हापूर १,०७,०१२
- छ. संभाजी नगर १,००,०४०
- नाशिक १,१२,१०८
- नागपूर ९५,२१०
- लातूर ५८,५८६
- इतर ६१,७१२
तक्रार निवारणाचे प्रयत्न
दोन विद्यार्थ्यांचे एकच सीट क्रमांक, पण वर्ष वेगळे असले तरी नोंदणीमध्ये अडथळा निर्माण होत असल्याचे पालक वृषाली झगडे यांनी 'लोकमत'ला सांगितले. याबाबत मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत केंद्राकडून तक्रार सोडविण्याचा प्रयत्न होतो आहे.
माझा मुलगा पार्थ हा फ्रेशर आहे. पण मागच्या वर्षीचा एक रिपीटर विद्यार्थी आणि माझ्या मुलाचा सीट नंबर एकच आहे, परंतु वर्ष वेगळे आहे. माझ्या मुलाने नोंदणी केलेली नसतानाही त्याला नोंदणी झाल्याचे पोर्टलवर सांगितले जाते. या अडचणी तातडीने सोडवायला हव्यात.
-भावना कुलकर्णी, पालक
माझे दहावीचे ४६९ गुण अधिक इंटरमीडिएट परीक्षेचे ३ गुण गुणपत्रिकेच्या हार्ड कॉपीमध्ये नमूद आहेत. परंतु, ते ऑनलाइन डिजिटल प्रणालीत दिसत नाही. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडचण निर्माण झाली आहे. ही सॉफ्टवेअर प्रणाली लवकर दुरुस्त व्हायला हवी.
-मोहम्मद फहिम युसुफ, विद्यार्थी