पोलीस भरतीतील मृत्यूंची जबाबदारी आयुक्तांनी स्वीकारली
By Admin | Updated: June 19, 2014 02:58 IST2014-06-19T02:58:26+5:302014-06-19T02:58:26+5:30
पोलीस भरती प्रक्रियेत पाच तरुणांचा मृत्यू होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. मुंबई पोलीस दलाचा प्रमुख म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो

पोलीस भरतीतील मृत्यूंची जबाबदारी आयुक्तांनी स्वीकारली
मुंबई : पोलीस भरती प्रक्रियेत पाच तरुणांचा मृत्यू होणे ही अत्यंत खेदाची बाब आहे. मुंबई पोलीस दलाचा प्रमुख म्हणून याची सर्वस्वी जबाबदारी मी स्वीकारतो. जेव्हा मुंबई पोलीस कौतुकास्पद कामगिरी करतात तेव्हा त्याचे श्रेय मलाच मिळते. मग या दुर्दैवी घटनेची जबाबदारी मी कशी टाळू शकेन, अशा शब्दांत मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया घाटकोपरच्या भरती केंद्रावर व्यक्त झाले.
आठवडाभरात घाटकोपरच्या केंद्रावर चार तर नवी मुंबईतील केंद्रावर एक अशा एकूण पाच उमेदवारांचा भरती प्रक्रियेतील पाच किलोमीटर धावण्याच्या शर्यतीत मृत्यू झाला. त्यानंतर पहिल्यांदाच मुंबई पोलिसांनी अधिकृतरीत्या आपली भूमिका मांडली. आयुक्त मारियांसह अप्पर महासंचालक (प्रशिक्षण) एस.पी. गुप्ता यांनी घाटकोपर केंद्राला भेट दिली. तेथील व्यवस्था, योजनांचा आढावा घेतला.
या वेळी माध्यमांशी बोलताना मारिया म्हणाले, राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेसाठी ३२ मिनिटांमध्ये पाच किलोमीटर धावण्याची चाचणी २०११पासून घेतली जाऊ लागली. तेव्हापासून यंदाची तिसरी भरती प्रक्रिया आहे. या तिन्ही प्रक्रिया उन्हाळ्याच्याच मोसमात याच पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्व्हिस रोडवर पार पडल्या. गेल्या वर्षी ६८ हजार उमेदवार याच सर्व्हिस रोडवर पाच किलोमीटर अंतर धावले. मात्र तेव्हा अशी एकही घटना घडली नव्हती. यंदाच्या भरती प्रक्रियेत तब्बल १ लाख ६ हजार उमेदवार सहभागी झाले आहेत. त्यापैकी ३० हजार १९६ उमेदवारांनी आजपर्यंत ही चाचणी पूर्ण केलेली आहे. उर्वरित उमेदवार ही चाचणी पूर्ण करणार आहेत. मात्र ज्या पाच उमेदवारांचे मृत्यू झाले ते सकाळच्या सत्रात झाले.
उन्हाळ्याच्याच हंगामात भरती प्रक्रिया का, या प्रश्नावर उत्तर देताना मारिया म्हणाले, लोकसभा निवडणुकांच्या बंदोबस्तासाठी बहुतांश मुंबई पोलीस दल रस्त्यावर होते. काही दिवसांत पाऊस सुरू होईल. त्यातच गणेशोत्सव, ईद, रमझान, दिवाळी, नवरात्र हा सणांचा हंगाम सुरू होईल. त्यातच विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. या सर्व कार्यक्रमांच्या बंदोबस्तात पुन्हा मुंबई पोलीस व्यस्त होतील आणि वर्ष संपेल.
गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त महाराष्ट्रातच पाच किलोमीटर धावण्याची चाचणी असते असे नाही. उलट निमलष्करी दल, इंडो तिबेटीयन सीमा पोलिसांसह छत्तीसगड पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत १५ किलोमीटर धावण्याची चाचणी होते. राजस्थान, उत्तराखंडसह अन्य राज्यांमध्ये हे अंतर १० किलोमीटर इतके असते आणि फक्त महाराष्ट्रातच उन्हाळी हंगामात ही प्रक्रिया घेतली जाते असेही नाही. महाराष्ट्रात पाच किलोमीटरचे अंतर धावण्यासाठी ३२ मिनिटांचा अवधी दिला जातो. मात्र अन्यत्र १०-१५ किलोमीटरसाठी २३ ते २४ मिनिटे इतकाच अवधी असतो, असा दावा मारिया यांनी केला. जे झाले ते दुर्दैवी होते, त्यासाठी मी कुटुंबीयांची माफी मागतो. मात्र भरती प्रक्रिया किंवा त्याचे नियम याला जबाबदार नाहीत, असे मारिया यांनी सांगितले. (प्रतिनिधी)