युती सरकार म्हणजे भरकटलेले जहाज
By Admin | Updated: November 30, 2015 02:54 IST2015-11-30T02:54:45+5:302015-11-30T02:54:45+5:30
राज्यातील भाजपा-सेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूगोलाच्या पेपरमध्ये समाजशास्त्र सोडवायला लागले तर कसे होणार?

युती सरकार म्हणजे भरकटलेले जहाज
चिपळूण : राज्यातील भाजपा-सेना सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. भूगोलाच्या पेपरमध्ये समाजशास्त्र सोडवायला लागले तर कसे होणार? राज्यात शेतकरी वाऱ्यावर आहे. मात्र हे सरकार म्हणजे भरकटलेले जहाज आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरात गुन्हेगारी वाढली आहे. कृषीप्रधान राज्यात स्वतंत्र कृषीमंत्री व गृहमंत्री नाही, ही शोकांतिका आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केली.
चिपळूण येथे महाराष्ट्र एस. टी. कामगार प्रतिनिधींच्या हल्लाबोल मेळाव्यासाठी ते येथे आले होते. राज्यात मोठा दुष्काळ पडला आहे. नऊवेळा केंद्रीय पथके आली परंतु, कोणतीही उपाययोजना नाही. जनावरे तडफडत आहेत. कोकणातही बागा होरपळल्या आहेत. फळबागांची उत्पादनक्षमता कमी झाली आहे. त्याची माहिती सरकारकडे नाही. राज्यात तूरडाळीची कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्या सरकारने २ हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला. त्याची जबाबदारी स्वीकारून संबंधित मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, असे ते म्हणाले.
शिवसेनेची नौटंकी सुरू आहे. ३ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या करूनही त्यांना जाग आली नाही. आता मराठवाड्याचा दौरा ते करत आहेत. कृषीमंत्र्यांनी दुष्काळी भागाचा अद्याप दौरा केलेला नाही, याकडे विखे यांनी लक्ष वेधले. कोकणचे पाणी मुंबईला नेण्याची गरज नाही. ठाणे व नाशिकमधून पाणी नेण्याची मान्यता आहे. चितळे समितीने सुचविलेले बंधारे बांधले तरी मुंबईचा पाण्याचा प्रश्न सुटू शकतो, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)