CM Devendra Fadnavis on Babanrao Lonikar Controversial Statement: परतुरचे भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांनी एका जाहीर कार्यक्रमात गावातील टीका करणाऱ्यांवर पातळी सोडून टीका केली. भर कार्यक्रमात कुचरवट्यावर टवाळकी करणारे दहा-बारा कार्टी, असा उल्लेख करत बबनराव लोणीकर यांनी सोशल मीडियावरुन टीका करणाऱ्यांवर भाष्य करत वादग्रस्त विधाने केली. तुमच्या अंगावरचे कपडे, पायातील चप्पल सरकारने दिल्याचे बबनराव लोणीकर म्हणाले. त्यांच्या विधानावरुन चौफेर टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे विधान चुकीचे असल्याचे म्हणत लोणीकर यांनी समज देणार असल्याचे म्हटलं. त्यानंतर लोणीकरांनीही यावर स्पष्टीकरण दिलं.
"बबनराव लोणीकरांचे विधान हे पूर्णपणे चुकीचे आहे. त्यांनी काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरी ते चुकीचे आहे. अशा प्रकारचे विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे पंतप्रधान जेव्हा सांगतात की मी प्रधानसेवक आहे आणि आम्ही सर्व जनतेचे सेवक आहोत. आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचे जे वक्तव्य आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे. अशा प्रकारची वक्तव्ये देणं योग्य नाही. तशी समज बबनराव लोणींकरांना देण्यात येईल," असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
बबनराव लोणीकरांचे स्पष्टीकरण
त्यानंतर आता बबनराव लोणीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत शेतकऱ्यांविरोधात बोलणार नाही असं लोणीकर यांनी म्हटलं.
"राजकीय पक्षांचे गाव पातळीवरील काही कार्यकर्ते गावात आहेत. ते पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना ट्रोल करतात. मी त्यांच्याबाबतीत बोललो. आमची भाषा खेड्यातील आहे. आम्ही वडिलांना बाप आणि आईला माय म्हणतो. एखाद्या मुलाने काम केले नाही, तो नीट शिकला नाही, तर आम्ही त्याला कार्ट म्हणतो. ही आमची बोलीभाषा आहे. मी माझ्या ग्रामीण भाषेत बोललो. मी मागील ४० वर्षांत केव्हाही सर्वसाधारण माणूस किंवा शेतकऱ्यांविरोधात बोललो नाही. मी नेहमी त्यांच्याबाजूने उभा राहणारा माणूस आहे. काही राजकारणी माझ्या विधानाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जनता जनार्दन माझी माय-बाप आहे. त्यांच्या आशीर्वादाने मी २५ वर्षांपासून निवडून येत आहे. त्यामुळे माझ्या अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी गरीब माणूस किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात बोलणार नाही. मी शेतकऱ्यांची एकदा काय हजारवेळा माफी मागेल. पण, मी त्यांच्याविषयी काहीही चुकीचे बोललो नाही. मला त्यांच्याविषयी आदर वाटतो," असं लोणीकर म्हणाले.
काय म्हणाले बबनराव लोणीकर?
“पारावर बसणारे काही रिकामचोट तरुण लिहितात की, गावातील ९-१० लोक माझ्या दावणीला बांधलेले आहेत. ते मोदी-फडणवीसांचे अंधभक्त आहेत. हे लोक विचारतात की, मोदींनी काय दिलं? फडणवीसांनी काय दिलं? आणि आमदाराने काय दिलं? गावात जे काही मिळालं ते गेल्या २५ वर्षांत मीच दिलं. ते कुचळवाट्यावर बसलेले पाच-सहा कारटे… त्याच्या मायचा पगार बबनराव लोणीकरने केला. त्याच्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये पंतप्रधान मोदी यांनी दिले. तुझ्या मायच्या, तुझ्या बहिणीच्या व बायकोच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारने दिले आहेत. तुझ्या पायातील बूट आमच्यामुळेच आहे. आमचेच पैसे घेतो आणि आमच्याच तंगड्या वर करतो. आमचंच घेतो आणि आम्हालाच बोलतो का?," असं लोणीकर म्हणाले.