मुख्यमंत्र्यांचा मंगळवारपासून पाहणी दौरा
By Admin | Updated: August 30, 2015 02:46 IST2015-08-30T02:46:40+5:302015-08-30T02:46:40+5:30
मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील दुष्काळी भागाचा एक सप्टेंबरपासून दौरा करणार असून, चारा छावण्या व पाण्याच्या टँकरचे नियोजन झाले. सरकार पैशांची कोणतीही

मुख्यमंत्र्यांचा मंगळवारपासून पाहणी दौरा
लोणी/अहमदनगर : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील दुष्काळी भागाचा एक सप्टेंबरपासून दौरा करणार असून, चारा छावण्या व पाण्याच्या टँकरचे नियोजन झाले. सरकार पैशांची कोणतीही कमतरता पडू देणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.
दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र चारा छावण्या नेत्यांसाठी कुरण ठरू नये, एवढीच अपेक्षा असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवर अप्रत्यक्ष टीकाही केली. कृषी विभाग व प्रवरा औद्योगिक, शैक्षणिक, सांस्कृतिक समूहातर्फे प्रवरानगर येथे डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील जयंतीनिमित्त आयोजित शेतकरी दिन, विविध पुरस्कार वितरण तसेच शहरात पालकमंत्री राम शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले.
फडणवीस म्हणाले, की राज्य दुष्काळात सापडले आहे. सर्वांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, त्यासाठी दौरा करणार आहे. सरकारने वर्षभरात शेतकऱ्यांना ७ हजार कोटींची मदत केली. मात्र त्यातून शेतकरी समृद्ध होत नाही. त्यासाठी राज्य दुष्काळमुक्त करणे, ही आपली दिशा असली पाहिजे. जलयुक्त शिवार योजना त्यासाठीच हाती घेतली आहे. योजनेतून पाणलोटाचा विकास करीत विकेंद्रित पाण्याचे साठे तयार केले जात आहेत.
डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील यांनी हे ७० च्या दशकातच ओळखले होते. केटीवेअरसारख्या योजनांतून त्यांनी सहकार उभा केला, मात्र आघाडी सरकारने दिशा बदलली ते मोठ्या धरणांच्या मागे लागले. धरण पूर्ण झाले की भरण होत नाही, म्हणून धरणे पूर्ण होऊ दिली नाहीत, अशी टीकाही त्यांनी आधीच्या सरकारवर केली. ३०० कोटींची जलयुक्त शिवारची कामे जनतेने स्वत:च्या पैशांतून केली. स्वातंत्र्योत्तर काळात असे प्रथमच घडल्याचा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)
खोऱ्यांतील पाण्याचे नियोजन : खोऱ्यांचा उपखोरेनिहाय अभ्यास केला जाईल. त्यातून अधिकचे पाणी उपलब्ध करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. २००४ मध्ये जलसंपत्ती नियमन आयोग झाला. मात्र त्याची पहिली बैठक मी मुख्यमंत्री झाल्यावर घेतली, एवढे जलनियोजनाकडे गेल्या काही वर्षांत दुर्लक्ष झाल्याचे ते म्हणाले.
आम्ही राजकीय विरोधक, शत्रू नव्हे!
लोकशाहीत आम्ही एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नव्हे, अशा शब्दांत फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांना लोणी येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या. विखे यांच्या भाजपा प्रवेशाची शंकाही व्यक्त झाली. चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न फडणवीस आणि विखे यांनी केला.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी सुरू असलेल्या राजकीय चर्चांवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की समाजकारण व राजकारणात जी अस्पृश्यता वाढत चालली आहे, ती भयंकर आहे. आरक्षणापेक्षा सध्या दुष्काळाचा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. दुष्काळातून माणसे वाचली तर आरक्षणाचा मुद्दा येईल. मराठवाड्याचा दुष्काळ राजकीय असल्याची टिप्पणीही त्यांनी केली.