गडकिल्ल्यांच्या जतनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुढाकार; पावित्र्य जपणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 06:11 IST2021-05-16T06:11:08+5:302021-05-16T06:11:25+5:30

मुख्यमंत्री सचिवालयाकडे संनियंत्रण

Chief Minister Uddhav Thackeray's initiative in preserving forts; To preserve holiness | गडकिल्ल्यांच्या जतनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुढाकार; पावित्र्य जपणार

गडकिल्ल्यांच्या जतनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुढाकार; पावित्र्य जपणार

मुंबई : गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या जतन आणि संवर्धनाचे संनियंत्रण मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षातून केले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी सांगितले.

गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपत, त्याच्या ऐतिहासिक आणि पुरातत्त्व वारशाला कोणताही धक्का न लावता या किल्ल्यांच्या परिसरात सुविधा निर्माण कराव्यात व तिथे पर्यटन केंद्र उभारून पर्यटकांना त्या वैभवशाली वारशाची माहिती द्यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी दुर्गप्रेमी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठक घेतली. बैठकीस मुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विजय सौरभ, सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्ष आदेश बांदेकर, दुर्गप्रेमी मिलिंद गुणाजी, अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, ऋषिकेश यादव, भारतीय पुरातत्त्व खात्याच्या अधिकारी नंदिनी भट्टाचार्य, महाराष्ट्र पुरातत्त्व खात्याचे अधिकारी, महाराष्ट्रातील गिरीप्रेम क्लबचे सदस्य आदी उपस्थित होते.

शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे आणि त्यांच्या ऐतिहासिक विजयाची साक्ष देणारे अनेक गडकिल्ले महाराष्ट्रात आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात पाच किल्ल्यांची निवड करून त्यांचे जतन आणि संवर्धनासाठी शासकीय तसेच इतर तज्ज्ञ, दुर्गप्रेमी अभ्यासकांचा सहभाग असलेली  एक मध्यवर्ती समिती स्थापन केली जाईल. रायगडाप्रमाणे इतरत्रही रोप-वे उभारण्याची शक्यता तपासून पाहावी. गडकिल्ल्यांच्या परिसरात हेलिकॉप्टरच्या साहाय्याने बिया टाकल्या तर नैसर्गिकरीत्या या भागात वनराई विकसित होण्यास मदत होईल, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पुरातत्त्व संचालक तेजस गर्गे यांनी जागतिक वारसा स्थळासाठी महाराष्ट्रातील १२ गडकिल्ल्यांचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवल्याचे सांगितले. मिलिंद गुणाजी यांनी गडकिल्ल्यांच्या परिसरातील पर्यटनस्थळे, इतर बाबींचा एकत्रित विकास करावा,  अशी महत्त्वाची सूचना केली.

प्रत्येक किल्ल्यासाठी...
निवडलेल्या प्रत्येक किल्ल्यांसाठी एक स्वतंत्र समिती स्थापन असेल. या किल्ल्यांच्या जतन, संवर्धनाच्या कामाचे मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षामार्फत संनियंत्रण केले जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
 

Web Title: Chief Minister Uddhav Thackeray's initiative in preserving forts; To preserve holiness