पाच वर्षे मीच मुख्यमंत्री
By Admin | Updated: July 22, 2015 01:39 IST2015-07-22T01:39:44+5:302015-07-22T01:39:44+5:30
माझा राजीनामा तुम्हाला मिळवता येणार नाही. मी पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहणार आहे. सगळी आव्हाने स्वीकारण्यास मी तयार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
पाच वर्षे मीच मुख्यमंत्री
मुंबई : माझा राजीनामा तुम्हाला मिळवता येणार नाही. मी पाच वर्षे मुख्यमंत्रीपदी राहणार आहे. सगळी आव्हाने स्वीकारण्यास मी तयार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी ठणकावले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणात विरोधकांनी वरचेवर व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला. मात्र अखेरीस कर्जमाफी न देणाऱ्या सरकारच्या विरोधात सभागृहाबाहेर आंदोलन करण्याचा इशारा देत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहाचे कामकाज दिवसभराकरिता तहकूब करण्यात आले.
माणिकराव ठाकरे यांच्या सूत गिरणीकरिता सरकारने भागभांडवलापोटी दिलेली रक्कम त्यांनी २४ वर्षे बँकेत मुदत ठेव स्वरूपात ठेवल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सोमवारी दिली होती. त्याचा उल्लेख करून ठाकरे यांनी ही रक्कम आपण कुटुंबाकरिता वापरलेली नसून मुख्यमंत्री देत असलेली माहिती असत्य असल्याचे स्पष्ट झाले तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. त्याचा संदर्भ देत फडणवीस यांनी वरील शब्दांत विरोधकांना ठणकावले.
फडणवीस म्हणाले की, विदर्भात जेथे कापूस पिकतो तेथे जर २५ वर्षे सूतगिरणी उभी राहणार नसेल तर शेतकरी आत्महत्या होणार नाहीत तर काय, असा सवालही फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांच्या या हल्ल्यास उत्तर देताना ठाकरे म्हणाले की, सूत गिरणी उभारण्यास १९९१ साली आपल्याला परवानगी मिळाली. गिरणीच्या यंत्र खरेदीकरिता लागणारा पूर्ण निधी उपलब्ध असल्याखेरीज खरेदी करता येणार नसल्याने ती रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवली आहे. मात्र आता गिरणी सुरू करण्याकरिता प्रकल्प अहवाल सादर केल्यावर बँक खाती गोठवणे ही राजकीय हेतूने प्रेरित अशी कारवाई आहे. (विशेष प्रतिनिधी)