“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2025 16:01 IST2025-06-08T16:01:18+5:302025-06-08T16:01:35+5:30
Chandrakant Khaire News: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येत असतील, तर एकनाथ शिंदे यांनीही सोबत यावे. म्हणजे मूळ शिवसेना पुन्हा तयार होईल, असे मत गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केले होते. याला चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आहे.

“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
Chandrakant Khaire News: आगामी महापालिका, स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत बरीच मोठी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असून, दुसरीकडे याच मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीतील नेत्यांकडून अनेक दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. राज ठाकरे केवळ उद्धव ठाकरेंशी युती करणार की, मविआत सामील होणार, याबाबतच्या चर्चांनीही जोर धरल्याचे पाहायला मिळत आहे. यातच शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी केलेल्या एका विधानावर चंद्रकांत खैरे यांनी आक्षेप घेतला आहे.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या जवळच्या माणसांपासून सावध राहिले पाहिजे आणि त्यांनी राज ठाकरेंना जवळ ठेवले पाहिजे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले, तर बाळासाहेबांना ती खरी श्रद्धांजली ठरेल. तसेच उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र आले, तर शिवसेना भक्कम होईल. शत प्रतिशत स्वबळावर राज्य करण्याची इच्छा ज्यांना कुणाला झालेली आहे, त्यांची ती इच्छा पूर्ण होणार नाही, जर हे तिघे एकत्र आले तर. पुन्हा ते वैभव मिळेल. एकत्र येऊन तर बघावे, असे गजानन कीर्तिकर यांनी म्हटले होते. यावर पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली.
एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला
एकनाथ शिंदे छे... ते कशाला पाहिजेत? त्यांनी उद्धव, आदित्य ठाकरे यांना त्रास दिला आहे. आम्हाला एकनिष्ठ असलेली व्यक्ती पाहिजे. गजानन कीर्तीकर हे तसे बोलले असतील कारण त्यांचा मुलगा आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना शिंदेंसोबत जाऊन पश्चात्ताप होत आहे, असा दावा खैरे यांनी केला.
दरम्यान, उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर ते दोघे मिळून महायुतीला धडा शिकवतील. दोन्ही बंधू एकत्र येतील म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र येण्याच्या उकळ्या फुटत आहेत. एकनाथ शिंदे गटाची परिस्थिती काही दिवसांत वाईट होईल. शिवसेना फोडली याचे गजानन कीर्तिकर यांना वाईट वाटत आहे, असे खैरे म्हणाले.