‘बिझनेस आयकॉन्स’ विकासाचे सारथी
By Admin | Updated: December 22, 2014 00:45 IST2014-12-22T00:45:02+5:302014-12-22T00:45:02+5:30
रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व परिश्रमाच्या बळावर आपल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या नागपुरातील खऱ्या ‘आयकॉन्स’चा शोध घेऊन

‘बिझनेस आयकॉन्स’ विकासाचे सारथी
नितीन गडकरी, सज्जन जिंदल यांचे गौरवोद्गार : लोकमतच्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’चे थाटात लोकार्पण
नागपूर : प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द व परिश्रमाच्या बळावर आपल्या क्षेत्रात यशाचे शिखर गाठून समाजासमोर नवीन आदर्श निर्माण करणाऱ्या नागपुरातील खऱ्या ‘आयकॉन्स’चा शोध घेऊन त्यांच्या यशाची गाथा ‘लोकमत’ने जगासमोर आणली. ही वृत्तपत्र क्षेत्रातील क्रांतिकारक घटना आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी व ‘जेएसडब्ल्यू ग्रुप’चे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक सज्जन जिंदल यांनी काढले. लोकमत वृत्तपत्र समूहाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या ‘बिझनेस आयकॉन्स आॅफ नागपूर’ या ‘कॉफी टेबल बुक’चे रविवारी एका शानदार समारंभात नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
‘हॉटेल सेंटर पॉर्इंट’ येथे झालेल्या या कार्यक्रमात सज्जन जिंदल यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूरकरांना अभिमान वाटावा अशी नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या ५४ ‘बिझनेस आयकॉन्स’च्या उत्तुंग यशाची गाथा या ‘कॉफी टेबल बुक’मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. या समारंभाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, महापौर प्रवीण दटके उपस्थित होते. अध्यक्षस्थानी लोकमत मीडिया प्रा.लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा होते.
समारंभाच्या सुरुवातीला ‘लोकमत’ समूहाच्या वाटचालीविषयीचा लघुपट सादर करण्यात आला. त्यानंतर दीपप्रज्वलन करून समारंभाची सुरुवात झाली. यावेळी लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली. यानंतर गडकरी व जिंदल यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व ‘लोकमत’च्या या उपक्रमाचे कौतुक केले. देशातील प्रत्येक शहरात असा उपक्रम सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे मत जिंदल यांनी व्यक्त केले. राष्ट्रगीताने या शानदार समारंभाची सांगता झाली. लोकमत नागपूरचे युनिट हेड नीलेशसिंह यांनी मान्यवरांचे स्वागत केले. लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र हेदेखील यावेळी मंचावर उपस्थित होते. श्वेता शेलगावकर यांनी संचालन केले.
या सोहळ्याला आ. सुधाकर देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. आशीष देशमुख, आ. समीर मेघे, माजी मंत्री अनिस अहमद, राजेंद्र मुळक, मनपा आयुक्त श्याम वर्धने, पोलीस आयुक्त के.के. पाठक, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधिक्षक प्रकाश जाधव, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. आरती सिंह, ‘वनराई’चे विश्वस्त गिरीश गांधी, अरुण उपाध्याय, जयप्रकाश गुप्ता आदी उपस्थित होते.
उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण
साधारणपणे उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणारे आणि इतरांसाठी रोजगार निर्माण करणारे उद्योजक प्रोत्साहनाच्या दृष्टीने उपेक्षित राहतात. परंतु उद्योजक एखाद्या भागाचा विकास करण्यात मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावत असतात. उद्योग क्षेत्रात शून्यातून विश्व साकारण्याची किमया करणाऱ्या उद्योजकांना लोकमतने हेरले आणि त्यांचा सन्मान केला. कॉफी टेबल बुकमध्ये त्यांची माहिती दिली आणि भव्य कार्यक्रमात त्यांना सन्मानित केले. यामुळे उद्योजकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. याशिवाय शहरातील सर्व उद्योजक, राजकीय नेते एकत्रित आल्याने कार्यक्रमात उत्साह होता.
नागपुरात व्हावा ‘आॅटोमोबाईल हब’: दर्डा
नागपूरच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकणारा ‘आॅटोमोबाईल हब’ लवकरात लवकर व्हावा, या मागणीचा पुनरुच्चार खा.विजय दर्डा यांनी आपल्या भाषणात केला. मी मुख्यमंत्र्यांशीही या विषयावर चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आणि गडकरी हे दोघेही विकासाला प्रोत्साहन देत असतात, असे सांगून या दोन्ही नेत्यांच्या प्रयत्नातून नागपूरची ‘आॅटोमोबाईल हब’ अशी ओळख प्रस्थापित व्हावी, अशी अपेक्षा दर्डा यांनी व्यक्त केली. शिवाय जिंदल हे विदर्भाशी जुळले असून त्यांनी या क्षेत्राच्या विकासाला हातभार लावावा असेदेखील ते म्हणाले. दरम्यान, विजय दर्डा यांनी या ‘कॉफी टेबल बुक’ची संकल्पना उपस्थितांसमोर मांडली. देशाच्या विकासात उद्योगपतींची मोलाची भूमिका असते व त्यांचे कार्य जगासमोर आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पदे ‘टेम्पररी’ असतात अहंकार बाळगू नका
माझ्याही आयुष्यात अनेक संकटे आली. इतरांच्या आयुष्यातही येतात. अशा वेळी संकटात सापडलेल्या कुठल्याही व्यक्तीची साथ सोडू नका, त्याला पाठ दाखवू नका, असे भावनिक आवाहन गडकरी यांनी केले. आज मंत्रिपद आहे. कदाचित उद्या नसेल. ही पोस्ट ‘टेम्पररी’ आहे. माणूस शिखरावर जातो तसा खालीही येतो. त्यामुळे अशा पदांमुळे अहंकार येऊ नये. मंत्रिपद जाताच १० मिनिटात लोक गायब होतात. लोक प्रशंसा करतात आणि आपण खूश होतो. सत्कार सोहळे व श्रद्धांजली सभा सारख्याच वाटतात. विमानतळावर लोक मोठमोठे गुच्छ घेऊन येतात. दिल्लीवाले तर खूपच डुप्लिकेट आहेत. पद गेले की ते साधी भेटही घेत नाहीत. विजयाचे बाप अनेक असतात, पराभव अनाथ असतो. कुणी कुणाला जिंकवत नाही आणि हरवत नाही. ‘आधी साखर येते, तेव्हाच नंतर चमचा येतो’ हे लक्षात ठेवा व सावध रहा, असा सल्ला त्यांनी राजकारणात मोठ्या पदांवर काम करणाऱ्यांना दिला.
शेती-खनिज उद्योगात विकासाची संधी : जिंदल
विदर्भात खनिज संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. शिवाय या क्षेत्रात शेतीचे प्रमाण मोठे आहे. येथे नैसर्गिक साधनसंपत्ती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही पाहिजे त्या प्रमाणात उद्योगांचा विकास झालेला नाही. या दोन्ही क्षेत्रांत योग्य त्या दिशेने काम झाले तर विदर्भ प्रगतीच्या शिखरावर पोहोचेल, असे मत सज्जन जिंदल यांनी व्यक्त केले. येत्या काळात कळमेश्वर येथील जेएसडब्ल्यू स्टीलच्या प्लांटचा विस्तार करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. जेएसडब्ल्यू ग्रुप ऊर्जा निर्मिती व सिमेंट क्षेत्रातही मोठी वाढ करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.