प्रियकराचा गळा आवळून केला खून

By Admin | Updated: August 22, 2016 00:51 IST2016-08-22T00:51:48+5:302016-08-22T00:51:48+5:30

महिलेने प्रियकराला बोलावून घेऊन त्याचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली.

The blood of the beloved girl is buried | प्रियकराचा गळा आवळून केला खून

प्रियकराचा गळा आवळून केला खून


पुणे : पती कामानिमित्त बाहेरगावी गेल्यानंतर महिलेने प्रियकराला बोलावून घेऊन त्याचा गळा आवळून खून केल्याची घटना शनिवारी पहाटे दीडच्या सुमारास घडली. शनिवारी सकाळी घरमालकाने बेशुद्धावस्थेत पडलेल्या मृताची माहिती पोलिसांना दिल्यावर तपासाची सूत्रे हलली. शवविच्छेदनाच्या अहवालामधून हा खून असल्याचे रात्री उशिरा निष्पन्न झाले. भारती विद्यापीठ पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली आहे.
वैभव बंडू राऊत (वय २१, रा. जैन मंदिर, साईनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अर्चना गणेश मनसावाले (वय २३, रा. शेलारवाडा, कात्रजगाव) हिला अटक करण्यात आली आहे. पोलीस हवालदार रवींद्र देवरुखकर (वय ५६) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्चना हिचे लग्न झालेले असून, तिचे पती गणेश मोटारीवर चालक आहेत. त्यांना चार वर्षांची एक मुलगी आहे. तर खून झालेल्या वैभवचेही सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेले आहे. तो रिक्षा चालवत होता. त्याचे आणि अर्चनाचे सहा महिन्यांपासून प्रेमसंबंध होते. लग्नानंतरही त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध येत होते. अनेकदा अर्चनाचे पती गणेश यांना प्रवाशांना घेऊन बाहेरगावी जावे लागत होते. अर्चना आणि वैभवच्या अनैतिक संबंधांची वैभवच्या कुटुंबीयांना कल्पना होती. त्यांनी एकमेकांचे संबंध तोडावेत यासाठी तीन-चार वेळा बैठकाही घेतल्या. मात्र, दोघेही कोणाचेही ऐकत नव्हते. गणेश यांना प्रवाशांना घेऊन बाहेरगावी जायचे होते. ते दोन दिवस बाहेरगावीच राहणार असल्यामुळे अर्चनाने वैभवला शुक्रवारी रात्री घरी बोलावून घेतले. दारू पिऊन तिच्या घरी आलेल्या वैभवसोबत काही वेळ गप्पा मारल्यानंतर त्यांच्यामध्ये वाद सुरू झाला. वैभवने तिला नवऱ्याला व मुलीला सोडून स्वत:सोबत चलण्याची गळ घातली. मात्र, अर्चनाने त्याला नकार देताच त्याने पट्ट्याने तिला मारहाण केली. चिडलेल्या अर्चनाने त्याचा हाताने गळा दाबून खून केला. या वेळी तिची चार वर्षांची मुलगी झोपलेली होती. सकाळी वैभवला तिने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे मदत मागण्यासाठी ती जवळच राहत असलेल्या चुलत बहिणीकडे गेली. चुलत बहिणीने तिला वैभवला रुग्णालयात नेण्यास सांगितले. (प्रतिनिधी)
>अर्चना सोलापूरची
अर्चनाचा पती गणेश आणि वैभव यांची ओळख कामामधून झालेली होती. एकमेकांकडे जाण्या-येण्यामधून अर्चना आणि वैभवमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. अर्चना आणि तिचा पती सोलापूरचे असून, वैभव उस्मानाबादचा रहिवासी होता. त्याचे वडील बंडू रावसाहेब राऊत यांच्या ताब्यात त्याचा मृतदेह देण्यात आला आहे. त्याच्यावर उस्मानाबादमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.सकाळी अकराच्या सुमारास तिचे घरमालक नितीन शेलार यांनी पोलिसांना फोन करून घरामध्ये एकजण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी वैभवचा मृतदेह ससून रुग्णालयात हलवला. दरम्यान, अर्चना कात्रज चौकीमध्ये गेली. तिच्याकडे चौकशी सुरू करण्यात आली. मृतदेहाच्या गळ्यावर व्रण होते तसेच कानाच्या खाली खरचटलेले होते. डॉक्टरांनी त्याचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केल्यावर त्याचा गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानुसार तिच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी दिली.

Web Title: The blood of the beloved girl is buried