भाजप-राष्ट्रवादीचा घटस्फोट!

By Admin | Updated: July 20, 2014 01:11 IST2014-07-20T01:11:46+5:302014-07-20T01:11:46+5:30

अगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष

BJP-NCP divorce! | भाजप-राष्ट्रवादीचा घटस्फोट!

भाजप-राष्ट्रवादीचा घटस्फोट!

जिल्हा परिषद : अध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी
गणेश हूड - नागपूर
अगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी २८ महिन्यांपूर्वी एकत्र आलेल्या भाजप-शिवसेनेपासून राष्ट्रवादी काँग्रेस घटस्फोट घेणार आहे. २० सप्टेंबरला होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजप-शिवसेना युतीत लढत होणार आहे. यासाठी दोन्हीकडून मोर्चेबांधणी सुरू असल्याने ही निवडणूक चुरशीची होणार आहे.
जि.प.तील भाजप-शिवसेनेसोबत असलेली आघाडी संपुष्टात आणा, असे पत्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा कमिटीला पाठविले आहे. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचे स्पष्ट आहे. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कार्यकाळ २० सप्टेंबरला, विषय समित्यांच्या सभापतींचा २ आॅक्टोबरला तर पंचायत समिती सभापतींची मदत १४ सप्टेंबरला संपत आहे. अध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव आहे.
केंद्रात भाजपची सत्ता आहे. विधानसभा निवडणुकीतही युतीचीच सत्ता येईल, अशी हवा आहे. अशा परिस्थितीत जि.प.तील सत्ता टिकविण्यासाठी भाजप नेत्यांनी मोर्चेबांधणी केली आहे. सदस्यांची पळवापळवी होऊ नये, यासाठी भाजप-शिवसेना व गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या आघाडीची जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदणी केली आहे. परंतु हा पक्षांतर बंदीचा कायदा राष्ट्रीय पक्षांनाच लागू होत असल्याने, याचा गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या सदस्यावर कोणताही परिणाम होणार नाही, असे जाणकाराचे मत आहे. तसेच अध्यक्षपद मिळाले नाही तर भाजप-शिवसेनेत बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे निवडणुकीत चमत्कार होणार असल्याची चर्चा आहे.
जि.प.तील ५९ सदस्यांत बसपा, गोगपा व आरपीआय पक्षांचा प्रत्येकी एक सदस्य आहे. या सदस्यांच्या भूमिकेवर सत्ता समीकरण अवलंबून आहे. सध्या सत्ताधारी आघाडीकडे भाजप २२, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७ व गोगपा १ असे ३८ चे संख्याबळ आहे. राष्ट्रवादी आघाडीतून बाहेर पडल्यानंतर ही संख्या ३१ होणार आहे. परंतु अध्यक्षपदाचे दावेदार अनेक असल्याने बंडखोरांची संख्याही मोठी आहे.
गेल्या निवडणुकीत अध्यक्षपदावरून भाजपमध्ये वाद निर्माण झाला होता. भाजपच्या निशा सावरकर व शिवसेनेच्या भारती गोडबोले यांनी बंडाची भूमिका घेतली होती. त्यामुळे ही निवडणूक चांगलीच गाजली होती. भाजपकडून अध्यक्षपदासाठी अरुणा रमेश मानकर व निशा टेकचंद सावरकर व शुभांगी गायधने यांच्या नावांची चर्चा आहे. काँग्रेसचा उमेदवार वेळेवर होणाऱ्या समीकरणानुसार ठरणार असल्याचे समजते.

Web Title: BJP-NCP divorce!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.