मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयएच्या विशेष न्यायालयाने मोठा निकाल दिला. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह सर्व ७ जणांची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. यावरून भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"काँग्रेसचंहिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान या निकालाने हाणून पाडलं" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये यांनी मालेगाव निकालावरून काँग्रेसवर टीका केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्वीट केलं आहे.
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक. मालेगाव बॅाम्बस्फोट खटल्याचा निकाल हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे काँग्रेसचं हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान या निकालाने हाणून पाडलं आहे. तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी प्रथम हिंदू दहशतवाद हा शब्द वापरला व नंतर शरद पवार यांनी अलिबाग येथे झालेल्या पक्षाच्या मेळाव्यात याचा उच्चार केला."
"चिदंबरम यांनी हीच भूमिका मांडली. सातत्याने दहशतवादी घटनांमध्ये एकाच समाजाचे आरोपी सापडत असताना मतांच्या राजकारणासाठी जाणीवपूर्वक हिंदू समाजाला बदनाम करायचं कारस्थान रचलं होतं" असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.
"मालेगावमध्ये स्फोट झाल्याचं सरकारी वकिलांनी सिद्ध केलं, परंतु त्या मोटारसायकलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला होता हे सिद्ध करू शकले नाहीत. जखमींचं वय १०१ नाही तर ९५ वर्षे होतं आणि काही वैद्यकीय प्रमाणपत्रांमध्ये छेडछाड करण्यात आली होती, असा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे" असं निकाल वाचताना एनआयए कोर्टाचे न्यायाधीश म्हणाले.
२९ सप्टेंबर २००८ रोजी लोक रमजान महिना आणि नवरात्रोत्सव साजरा करण्यात व्यस्त होते. रात्री ९.३५ वाजता मालेगावमधील भिखू चौकात बॉम्बस्फोट झाला. सर्वत्र धूर आणि लोकांचे किंकाळ्या ऐकू येत होत्या. ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. १०० हून अधिक लोक जखमी झाले. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या शहरात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात राहतात. या ठिकाणीच हा स्फोट झाला होता.