मुंबईतील ऐतिहासिक आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा दिमाखदारपणे पार पडला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महायुती सरकारच्या शपथविधीत ठरल्याप्रमाणे या तीन जणांनीच शपथ घेतली. याच दरम्यान भाजपाने खोचक टोला लगावला आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आता "मी पुन्हा येईन" यावरून खिल्ली उडवणाऱ्या लोकांवर भाजपाने जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. "मग्रूरी, मस्तवालपणा, माज, मस्ती, अराजकता, विश्वासघात, खुनशीवृत्तीवाले घरीच बसले!" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी पलटवार केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच देवाभाऊ असं म्हणत एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.
"तो खरंच पुन्हा आलाय बरं का! मग्रूरी, मस्तवालपणा, माज, मस्ती, अराजकता, विश्वासघात, खुनशीवृत्तीवाले घरीच बसले! आता झकासपैकी पाच वर्षे घरीच बसा.. टिंगल,टवाळी करत!" असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्यांनी आणखी एक ट्विट केलं आहे. "आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य."मी देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस.." हे शब्द ऐकले आणि आमच्या देवाभाऊंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, या विलक्षण अनुभूतीमुळे अंगावर अक्षरशः रोमांच उमटले."
"राज्यातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ.. देवा भाऊ.. आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि महायुती सरकारला खूप खूप शुभेच्छा! आदरणीय देवेंद्रजी म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचे केंद्र, इन्फ्रा मॅन, मेट्रो मॅन, जलक्रांतीचे प्रणेते, विकास पुरुष.. आदरणीय देवेंद्रजी म्हणजे अष्टपैलू नेतृत्व, अमोघ वक्तृत्व आणि अफाट कर्तृत्व!महाराष्ट्रात साकारणार देवेंद्रपर्व.. अर्थात् विकासपर्व! ...याचसाठी केला होता अट्टहास॥ आमचा देवाभाऊ “मुख्यमंत्री” लाडक्या बहिणींच्या लाडक्या देवाभाऊचे खूप खूप अभिनंदन व शुभेच्छा!" असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.