आदित्य ठाकरे यांनी काल ठाण्यामध्ये शिवसैनिकांसोबत संवाद साधला. याच दरम्यान "शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना! हे नातं कुणीही कधीच पुसू शकणार नाही. निष्ठावंत शिवसैनकांच्या बळावर आजही ताकदीने ठाण्यात शिवसेनेचा बुरुज उभा आहे. ही जनता सोबत असताना माझ्या बुरुजाला कुणीही सुरुंग लावू शकत नाही" असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरेंना आता भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "वरळीतील जनता आजही शोध घेत आहे, आमदार कुठे हरवलेत? वरळीतून आता निवडून येणे शक्य नसल्याने, ठाण्यात जाऊन तोंडाच्या वाफा घालवणे सुरु आहे?" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "हिंमत असेल तर द्या राजीनामा आणि या वरळीत आमच्या समोर" असं म्हणत आव्हान दिलं आहे.
"ज्या वरळी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार आदित्य ठाकरे करतात... त्या वरळीतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे प्रकल्प 20 वर्षाहून अधिक काळ रखडलेत, तुमच्या काळात एकही विट रचली गेली नाही. वरळी गावठाण, कोळीवाड्यातील जनतेचे कोरोना काळात अतोनात हाल झाले ते दुनियेने पाहिले. कोस्टल रोडच्या खांबांमुळे वरळीच्या कोळी बांधवांचा व्यवसाय धोक्यात आला ते टाहो फोडत होते, तेव्हा पालकमंत्री असताना तर कोळी बांधवांना भेटायला सुध्दा तुमच्याकडे वेळ नव्हता."
"वरळीच्या बिडीडी चाळींतील व्यवसायिक गाळे आणि रहिवाशांना पुनर्विकासीत घरे देणे तुम्हाला जमले नाही, त्यात जमेल तेवढा खोडाच घातलात. कोस्टल रोड तर तुमच्या काळात न्यायालयात अडकला. पोलीस वसाहतील पोलीसांना तुम्ही घरे देऊ शकला नाहीत. वरळीतील जनता आजही शोध घेत आहे, आमदार कुठे हरवलेत? वरळीतून आता निवडून येणे शक्य नसल्याने, ठाण्यात जाऊन तोंडाच्या वाफा घालवणे सुरु आहे? गरंगोटीच्या नावाखाली वरळीतील चारदोन भिंतीना चुना लावून अशा प्रकारे वरळीतून पळ काढताय? मी तुम्हाला थेट आव्हान देतो... हिंमत असेल तर द्या राजीनामा आणि या वरळीत आमच्या समोर!!" असं आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.