त्या सोनचाफ्याच्या फुलांचा गंध आजही मनात..., गायिका पद्मजा फेणाणी यांनी जागविल्या आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:35 IST2026-04-13T08:34:59+5:302026-04-13T08:35:40+5:30
Asha Bhosle News: गानसम्राज्ञी लतादीदी यांच्यानंतर भारतीय संगीत युगातील एका महान पर्वाचा अंत झाला आहे. आशाताईंनी ज्या काळात आपली कारकीर्द सुरू केली त्यावेळी त्यांच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान साक्षात लतादीदींचे होते.

त्या सोनचाफ्याच्या फुलांचा गंध आजही मनात..., गायिका पद्मजा फेणाणी यांनी जागविल्या आठवणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - गानसम्राज्ञी लतादीदी यांच्यानंतर भारतीय संगीत युगातील एका महान पर्वाचा अंत झाला आहे. आशाताईंनी ज्या काळात आपली कारकीर्द सुरू केली त्यावेळी त्यांच्यासमोर सर्वांत मोठे आव्हान साक्षात लतादीदींचे होते. मात्र, त्यांनी आपली स्वतंत्र शैली तयार केली आणि रसिकांची मने जिंकली, अशा शब्दांमध्ये प्रख्यात ज्येष्ठ गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी आपल्या आठवणी जागविल्या आहेत.
आशाताईंनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी गाऊन विक्रम केला. मला त्या काळातील गायकांची एक गोष्ट विशेष भावते. अर्थात मी ही त्याच प्रकारे गायन केले आहे, ते म्हणजे लाईव्ह रेकॉर्डिंग. त्यावेळी आजच्यासारखे तंत्रज्ञानावर आधारित संगीत नव्हते. तर, गायक, वादक एकाचवेळी उपस्थित राहून गाणे रेकॉर्ड करायचे. त्यावेळी पहिल्या टेक किंवा फारतर दुसऱ्या टेकमध्ये गाणे ओके करावे लागायचे. मात्र, हे करताना गाण्यातील भाव, उच्चार त्या गीताचे सार सर्व काही गाण्यात उतरवणे हे आव्हानात्मक असायचे. अशी हजारो गाणी आशाताईंनी अजरामर केली आहेत, असे त्या म्हणाल्या.
आशाताईंच्या गायकीचे एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी नाट्यसंगीतापासून, रॅप, पॉप, भजन, कॅब्रे अशा विविध प्रकारांत गायन केले. या प्रत्येक गान प्रकाराचे अप्रतिम भान त्यांच्याकडे होते. त्यामुळे ज्या पद्धतीचे गाणे असेल त्यानुसार त्याला पूर्ण न्याय त्या देत असता. 'धर्मकन्या' या सिनेमातील 'नंदलाला रे' हे पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेले गाणे आशाताईंनी गायले. हे गाणे माझ्या सर्वात आवडते गाणे आहे. या गाण्यामध्ये कमाल जागा, हरकती, मुरक्या, चमकदार वेगवान ताना आहेत. निव्वळ शास्त्रीय संगीत गाणाऱ्या गायकालाही आव्हानात्मक वाटेल, असे हे गाणे त्यांनी गाऊन अजरामर केले आहे. त्यांच्या गायकीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, त्या गाणे समरसून गात होत्या. त्यामुळे चित्रपट पाहताना जणू ती अभिनेत्रीच गात आहे, असा भास व्हायचा. या निमित्ताने एक आठवण सांगावीशी वाटते. दादर येथील महात्मा गांधी जलतरण तलावाच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमात माझे गायन होते. माझा कार्यक्रम संपताना आयोजकांनी सांगितले की, आशाताई येत आहेत आणि तुम्ही थांबाच, असा त्यांचा निरोप आहे. मला दुसऱ्या दिवशी कार्यक्रम असल्याने वेळेची थोडी गडबड होती. त्यामुळे द्विधा मनस्थिती होती पण तेवढ्यात आशाताई आल्या. त्यांनी माझ्यासाठी सोनचाफ्याची फुले आणली होती. त्यांनी माझ्या ओंजळीत ती फुले दिली. त्यांचा घमघमाट मनात दरवळत आहे, असे त्या म्हणाल्या.