खतांची कृत्रिम टंचाई पडू शकते महागात!
By Admin | Updated: May 20, 2014 22:43 IST2014-05-20T22:05:55+5:302014-05-20T22:43:19+5:30
कृषी विभागाच्या प्रयत्नांना हाणून पाडत कृषी सेवा केंद्र खतांची कृत्रिम टंचाई भासवून किंमतीपेक्षा जास्त रक्कम शेतकर्यांच्या माथी मारण्याची शक्यता

खतांची कृत्रिम टंचाई पडू शकते महागात!
वाशिम : रासायनिक खतांचा काळाबाजार व त्यातून शेतकर्यांची होणारी लुटमार थांबविण्यासाठी कृषी विभाग विविध उपाययोजना राबवित आहे. तर दुसरीकडे कृषी विभागाच्या प्रयत्नांना हाणून पाडत कृषी सेवा केंद्र खतांची कृत्रिम टंचाई भासवून किंमतीपेक्षा जास्त रक्कम शेतकर्यांच्या माथी मारण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खताची कृत्रिम टंचाई निर्माण करणार्यांवर वॉच ठेवण्यासाठी सात पथके गठीत केली आहेत. शेतकर्यांनीदेखील शासकीय किंमतीत विविध प्रकारच्या खतांची खरेदी करावी आणि कृषी सेवा केंद्राच्या संचालकाकडून अधिकृत बिल घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे आणि कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांनी केले आहे. खताचा काळाबाजार, अवैध साठा, जादा दराने खत विक्री, लिंकीग पध्दत आदी शेतकर्यांना भंडावून सोडणार्या गैरप्रकारांना काबुत आणण्यासाठी शासन व कृषी विभाग बांधवावर खत, एमएफएमएस प्रणाली आदी उपाययोजना करीत आहे. कृषी सेवा केंद्रांनी जादा दराने खताची विक्री करु नये यासाठी उपलब्ध खतसाठा व किंमतीचे फलक लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.