वरातीऐवजी निघणार अंत्ययात्रा, गोंदियामध्ये हुंडाबळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2016 18:57 IST2016-11-08T18:57:35+5:302016-11-08T18:57:35+5:30
लग्नाला केवळ पाच दिवस उरलेले असताना एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

वरातीऐवजी निघणार अंत्ययात्रा, गोंदियामध्ये हुंडाबळी
ऑनलाइन लोकमत
गोंदिया, दि. 8 - लग्नाला केवळ पाच दिवस उरलेले असताना एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आमगाव तालुक्यातील रिशामा गावातील ही घटना आहे. सासरच्या मंडळींनी हुंडा मागितला म्हणून लग्नाआधीच या तरुणीने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.
तसा उल्लेख तिने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतदेखील केला आहे. संध्या बारई असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे असून 13 नोव्हेंबर रोजी नागपूरच्या प्रदीप भोंगेकरसोबत तिचे लग्न होणार होते. मात्र, मुलाकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने संध्या कंटाळली होती.
यामुळे तिने आत्महत्या करुन स्वतःचे आयुष्य संपवण्याचे टोकाचे पाऊल उचलले. दरम्यान याप्रकरणी आरोपी मुलाविरोधात मृत मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्या घरातून मुलीच्या लग्नाची वरात निघणार होती, त्याऐवजी आता तिची अंत्ययात्रा निघणार असल्याने संध्याच्या आई-वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.