नागपूरमधील धापेवाडा येथील भक्ती फार्ममध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन यांनी ८०० ग्रॅम ते १ किलोपर्यंत वजन भरणारे कांदे उत्पादित केले आहेत. याची माहिती खुद्द नितीन गडकरी यांनी दिली आहे. गडकरींनी याचा व्हिडीओ पोस्ट केला असून बिया कुठून आणल्या, काय तंत्रज्ञान वापरले याची माहिती दिली आहे.
हे सर्व कांदे सेंद्रिय आहेत. या बिया नेदरलँडहून आणण्यात आल्या होत्या. सेमिनीस कंपनीच्या या अडीच किलो बिया एका एकर जमिनीत पेरण्यात आल्या. तिथे ४५ दिवस नर्सरी तयार करण्यात आली. यानंतर वाढलेली रोपे दुसरीकडे लावण्यात आली. डबल ड्रिप इरिगेशन करण्यात आले. या मातीत बायो ऑर्गॅनिक फर्टिलायझर मिक्स करण्यात आले होते. यानंतर या बेडवर मल्चिंग पेपर टाकण्यात आला, त्याला होल मारून रोपे लावण्यात आली.
जवळपास २४ हजार कांद्याची रोपे लावण्यात आली. या काळात ७ ते १० टक्के मृत्युदर राहिला, जो शेतीच्या प्रमाणात कमी होता. अखेर कांदा तयार झाला, एका कांद्याचे वजन ४०० ग्रॅम ते ८००-१००० ग्रॅम एवढे भरले. एका एकरातून गडकरींनी १२ ते १३ टन उत्पादन घेतले आहे. या काळात सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली. अशाप्रकारे जर कोणी शेतकरी सेंद्रीय शेती करणार असेल तर आम्ही त्याला पूर्ण मदत करू, असे आश्वासन गडकरी यांनी दिले आहे.
देशामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये खरीप हंगामामध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. मात्र, काही नैसर्गिक संकट उद्भवल्यास कांद्याच्या उत्पादनामध्ये कपात होऊन देशामध्ये कांद्याची टंचाई निर्माण होऊन दरवाढ होत असते. नाशिक, पुणे व सोलापूर पट्ट्यात कांद्याचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. परंतू लाल कांदा उत्पादनात नाशिक जिल्ह्याची ‘मोनोपॉली’ असल्याचे आजही मानले जाते. वास्तवात, ती पाच-सात वर्षांपूर्वीच मोडीत निघाली आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान व कर्नाटकमध्ये लाल कांद्याचे मागील पाच वर्षांपासून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते.