अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत आला आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावरून दोन्ही गटांचे नेते वेगवेगळे दावे करत आहेत. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं विलिनीकरण व्हावं, ही अजित पवार यांची अखेरची इच्छा होती, असा भावूक दावा राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेत्यांकडून केला जात आहेत. याचदरम्यान, विलिनीकरणाचा विषय अजित पवार यांच्या मनात असता तर त्यांनी माझ्यासोबत चर्चा केली असती, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केला होता. त्यावरून आता संजय राऊत यांनी फडणवीस यांना टोला लगावला आहे.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्यावरून संजय राऊत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही. अजित पवार हे स्वत:च्या पक्षाचे नेते आणि प्रमुख होते. ते स्वत:च्या मर्जीने भाजपासोबत गेले होते. पुढे भाजपा हा आपल्या महाराष्ट्राच्या विचाराचा पक्ष नाही, असे त्यांना वाटले असावे. आता अजित पवार हे फडणवीसांबाबत खाजगीत बरंच काही बोलायचे, असा दावा आम्ही केला तर. अजित पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नसेल म्हणून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाबाबत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली नसेल, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
जर अजित पवार यांना स्वगृही जायचं असेल तर त्यांनी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरजच काय होती. फडणवीस यांचा पक्ष हा अखंड महाराष्ट्राच्या विरोधात आहे. फडणवीस यांचा पक्ष मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या बाजूने आहे, अशा वेळी अजित पवारांसारखा नेता या भूमिकेवर काम करू शकणार नाही, हे आम्हाला माहिती होतं. अजित पवार यांच्याशी आमच्याही चर्चा होत होता. आता अजित पवार यांनी विलिनिकरणाबाबत आपल्याशी चर्चा का केली नाही, याचं देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करावं, असा सल्लाही संजय राऊत यांनी दिला.