राष्ट्रवादीशी हवा काडीमोड
By Admin | Updated: May 30, 2014 01:03 IST2014-05-30T01:03:19+5:302014-05-30T01:03:19+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी परिश्रम घेतले. मात्र या निवडणुकीत युवा स्वाभिमान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या

राष्ट्रवादीशी हवा काडीमोड
मंथन बैठक : जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या सभेत ठराव पारित
अमरावती : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकदिलाने काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी परिश्रम घेतले. मात्र या निवडणुकीत युवा स्वाभिमान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम न केल्यामुळे उमेदवाराचा पराभव झाला. यापूर्वीच्या निवडणुकीची परिस्थिती लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस उमेदवारांसाठी समन्वयाने काम करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने स्वबळावर निवडणुका लढवाव्यात. काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेस व इतर कुठल्याही पक्षाशी युती न करता निवडणुकीला सामोरे जावे, असा ठराव अमरावती जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या बैठकीत गुरुवारी सर्वानुमते घेण्यात आला.
येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या जिल्हा काँग्रेस कमिटीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख होते.
शेतकरी, शेतजमुर व बेरोजगारांसाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांची तातडीने अंमलबजावणी करावी, जिल्ह्यातील भारनियमन बंद करावे, कृषिपंपाच्या प्रलंबित असलेल्या वीज जोडण्या त्वरित पूर्ण कराव्यात, खरिप हंगाम लक्षात घेता शेतकर्यांना पुरेसे खत व बी-बियाणे उपलब्ध करुन द्यावे, सच्चर समितीच्या शिफारसी लागू कराव्यात, अशा मागण्याही करण्यात आल्या. हा ठराव सर्वानुमते मंजुर करुन हा ठराव प्रदेश काँग्रेसकडे पाठविण्यात येणार आहे.
या बैठकीला हरिशंकर अग्रवाल, सुधाकर भारसाकळे, प्रकाश काळबांडे, रावसाहेब लंगोटे, अनंत साबळे, बंडू देशमुख, महेंद्र गैलवार, विलास पवार, प्रमोद काळबांडे, संजय वानखडे, प्रमोद दाळू, संजय तट्टे, संजय लायदे, सुफी, भागवत खांडे, मुरलीधर नाईक, लोभीलाल मालवीय, प्रकाशसिंह तरवले, स्वप्निल कोकाटे, प्रल्हाद ठाकरे, कैलास आवारे, मुकुंद देशमुख, अजय नागमोते, मोहन सिंघवी, सुरेश आळे, किशोर किटुकले, प्रतिभा बुक्कावार, दयाराम काळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. सभेचे संचालन संजय मापले व आभार प्रदर्शन भैयासाहेब मेटकर यांनी केले. (प्रतिनिधी)