मराठा समाजाला न्याय देण्याच्या मागणीमुळे कारवाई
By Admin | Updated: May 30, 2014 02:26 IST2014-05-30T02:26:02+5:302014-05-30T02:26:02+5:30
मराठा समाजाला आरक्षण आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा मुद्दा लावून धरला.

मराठा समाजाला न्याय देण्याच्या मागणीमुळे कारवाई
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण आणि अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचा मुद्दा लावून धरला. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेतल्यामुळे निलंबनाची कारवाई केली का, असा सवाल शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आ. विनायक मेटे यांनी गुरुवारी केला. विधिमंडळ वार्ताहर संघात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठा आरक्षण आणि शिवरायांचे स्मारक हे दोन्ही मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात आहेत. त्यामुळे यासाठी केलेले आंदोलन पक्षविरोधी कारवाई कशी ठरू शकते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मेटे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत महायुतीत प्रवेश केला. त्यामुळे मेटेंची आमदारकी रद्द करण्याची मागणी राष्ट्रवादीने विधान परिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याकडे केली. त्याअनुषंगाने विधिमंडळाचे प्रधान सचिव अनंत कळसे यांनी विनायक मेटेंना समन्स बजावले आहे. ‘अपात्रतेसाठी बजावलेल्या समन्सला सात दिवसांत पुराव्यानिशी लेखी उत्तर द्यायचे असून माझे वकील कायदेशीर उत्तर देतील,’ असे मेटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)