अपहरणाचा प्रयत्न; मुंबईतील ७ अटक
By Admin | Updated: May 9, 2017 02:12 IST2017-05-09T02:12:53+5:302017-05-09T02:12:53+5:30
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून शेतकऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न वालचंदनगर पोलिसांच्या नाकेबंदीमुळे फसला.

अपहरणाचा प्रयत्न; मुंबईतील ७ अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
वालचंदनगर (पुणे) : जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून शेतकऱ्याच्या अपहरणाचा प्रयत्न वालचंदनगर पोलिसांच्या नाकेबंदीमुळे फसला. शेतकऱ्यासह त्याच्या मजुराला घेऊन मुंबईला निघालेले सात गुंड जंक्शनमध्ये नाकेबंदीत सापडले. ते मुंबईतील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
अशोक श्रीरंग सकपाळ, नितीन चंद्रकांत जाधव, स्वप्नील निरंजन गुरव, युवराज सुरेश शिरधनकर, राजू शशिकांत जाधव, उज्ज्वल जेठालाल छेडा, किशोर नारायण सकपाळ (सर्व राहणार मुंबई) अशी अटक केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्याकडून २ पिस्तुले, ४ मॅगझिन, ३० राऊंड, १० मोबाईल,दोन मोटारी जप्त करण्यात आल्या.
जंक्शन येथे नेहमीप्रमाणे दररोज नाकेबंदी करण्यात येत असल्याने गाड्यांची काळी काच पाहून त्यांना अडविण्यात आले. त्याच दरम्यान गाडीतून कोणीतरी ओरडल्याचा आवाज आल्यानंतर पोलिसांनी तातडीने ड्रायव्हरसह सात जणांना ताब्यात घेतले. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.