रायगडावरील 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू

By Admin | Updated: March 17, 2017 10:51 IST2017-03-17T10:46:52+5:302017-03-17T10:51:37+5:30

रायगड किल्ल्यावरील जवळपास 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे

9 thousand plants on Raigad death due to lack of water | रायगडावरील 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू

रायगडावरील 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
महाड (रायगड), दि. 17 -  रायगड किल्ल्यावरील जवळपास 9 हजार झाडांचा पाण्याअभावी मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जलसंधारणमंत्री राम शिंदे यांनीच ही धक्कादायक माहिती दिली आहे.  जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती. मात्र त्यांची योग्य काळजी न घेण्यात आल्याने या झाडांचा मृत्यू झाला आहे. 
 
एकीकडे गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष निधी मंजूर केला जात असताना गडावरील या नैसर्गिक संपत्तीकडे मात्र दुर्लक्ष केलं जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राज्य करण्याचं आश्वासन दिलेल्या भाजपा - शिवसेनेच्या सरकारमध्येच किल्ले रायगडावरील 8 हजार 825 हून अधिक औषधी वनस्पती पाण्याअभावी नष्ट झाल्या आहेत. 
 
(किल्ले रायगडसाठी ६०७ कोटी)
 
जुलै 2016 मध्ये जवळपास 16 हजार औषधी वृक्षांची जलसंधारण योजनेअंतर्गत ही लागवड करण्यात आली होती. रोजगार हमी योजनेअंतर्गत झाडांना पाणी देण्यासाठी मजूर लावण्यात आले होते. मात्र, अपुऱ्या मजुरीअभावी त्यांनी कामाकडे पाठ फिरवली. यानंतर स्थानिक स्वयंसेवी संस्थांकडूनही मदत घेण्यात आली. मात्र, त्यांनीही सहकार्य न केल्यान अखेर 9 हजार झाडांनी माना टाकल्या आहेत.
 
विशेष म्हणजे नुकतंच शिवकाळात स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या विकासासाठी ६०७ कोटींचा घसघशीत निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे. याशिवाय म्हैसमाळ, वेरु ळ, खुलताबाद, सुलीभंजन आणि लोणार (बुलडाणा) तसेच माहूर देवस्थान (नांदेड) यांच्या विकास आराखड्यांनाही मंजुरी मिळाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी बुधवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 
 
विकास आराखड्यात पर्यटकांसाठी मुलभूत सोयी-सुविधांना प्राधान्य देण्याचे फडणवीस यांनी निर्देश दिले. रायगडला शिवसृष्टीसारख्या सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. रायगड किल्ल्यावर प्राचीन वास्तूंचे संवर्धन, शास्त्रयुक्त पद्धतीने डेब्रिज काढणे व उत्खननातील प्राचीन इमारतीचे संवर्धन करणे, गडावर विविध ठिकाणी आधुनिक पद्धतीची स्वच्छतागृहे बांधणे, घनकचरा व्यवस्थापन, रायगड किल्ल्यावरील सर्व वस्तूंचे डॉक्युमेन्टेशन, हद्दीचे सीमांकन आदी कामांचा आराखड्यात समावेश आहे. 
 

Web Title: 9 thousand plants on Raigad death due to lack of water