सांगली : अलमट्टी, हिप्परगी धरणातीलपाणीसाठा, विसर्गाची वस्तुस्थितीची माहिती मिळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने ३२ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांना रोज बदलून ड्युट्या लावण्यात येणार आहेत, असे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २९ जून १५ ऑक्टोबर या कालावधीत अधिकारी धरणाच्या ठिकाणी असणार आहेत.कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे अलमट्टी धरणात ७६ हजार ७०१ क्युसेकने पाण्याची आवक होत असून विसर्ग ७० हजार क्युसेक आहे. धरणात सध्या ७६.५९ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण ६२ टक्के भरले आहे. गतवर्षी २४ जून २०२४ रोजी २५ टक्के धरणात पाणीसाठा होता. जून महिन्यातच धरण ६२ टक्के भरल्यामुळे कृष्णा, वारणा आणि पंचगंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अलमट्टी धरण आणि हिप्परगी बॅरेज येथील वस्तुस्थितीची माहिती मिळण्यासाठी सांगली पाटबंधारे विभागाने अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अलमट्टी धरण येथे १६ आणि हिप्परगी बॅरेज येथे १६ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या अधिकाऱ्यांना प्रत्येक दिवशी बदलून तिथे नियुक्त्या दिल्या आहेत. या अधिकाऱ्यांनी रोज सांगली पाटबंधारे विभागातील पूर नियंत्रण कक्षाला प्रत्येक तासाला धरणातील पाणीसाठा, विसर्ग, धरणाचे दरवाजे किती खुले आहेत यासह आदी माहिती कळवायची आहे.
कर्तव्यात कसूर केल्यास शिस्तभंगाची कारवाईसमन्वय अधिकारी यांनी नेमून दिलेल्या कामात कसूर केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत म.ना.से. (शिस्त व अपील) १९७९ अंतर्गत शिस्तभंगविषयक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी अलमट्टी आणि हिप्परगी येथे वेळेत उपस्थित राहिले पाहिजे, असेही आदेशात म्हटले आहे.