२००२ मुंबई बाँबस्फोट प्रकरण : १० जण दोषी, तिघांची निर्दोष सुटका
By Admin | Updated: March 29, 2016 12:23 IST2016-03-29T12:02:00+5:302016-03-29T12:23:35+5:30
डिसेंबर २००२ ते मार्च २००३ साली मुंबईत झालेल्या साखळी बाँबस्फोटप्रकरणात टाडा न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले असून तिघांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली.

२००२ मुंबई बाँबस्फोट प्रकरण : १० जण दोषी, तिघांची निर्दोष सुटका
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - मुंबईत डिसेंबर २००२ ते मार्च २००३ साली झालेल्या बाँबस्फोटप्रकरणात टाडा न्यायालयाने १० जणांना दोषी ठरवले असून तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. या १० दोषींना उद्या शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
डिसेंबर २००२ व मार्च २००३ मध्ये मुंबईतील मुलुंड, मुंबई सेंट्रल आणि विलेपार्ले येथे साखळी स्फोट झाले होते. त्याप्रकरणी आज टाडा कोर्टाने निकाल सुनावत १० आरोपींना पोटा, शस्त्रास्त्रे कायदा, रेल्वे कायद्याअंतर्गत दोषी ठरवले. तर नदीम पालोबा, हरून लोहार आणि अदनान मुल्ला या तिघांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.
डिसेंबर २००२ ते मार्च २००३ या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण स्फोटांनी मुंबईकर हादरले. मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या इमारतीतील मॅकडोनाल्ड्समध्ये ६ डिसेंबर २००२ रोजी पहिला स्फोट झाला तर २७ जानेवारी २००३ साली विलेपार्ले पूर्वेकडील गजबजलेल्या मार्केटमध्ये दुसरा स्फोट झाला. तिसरा व शेवटचा स्फोट १३ मार्च २००३ रोजी मुलुंड स्थानकातील गर्दीने खचाखच भरलेल्या कर्जत लोकलमध्ये झाला. या तिनही स्फोटांमध्ये १२ जण ठार २७ जण गंभीररित्या जखमी झाले.