येरोळ परिसरातील सोयाबीनवर हळद्या रोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:26 IST2021-09-16T04:26:27+5:302021-09-16T04:26:27+5:30
येरोळ : येरोळ व परिसरातील सोयाबीनवर सध्या हळद या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत ...

येरोळ परिसरातील सोयाबीनवर हळद्या रोग
येरोळ : येरोळ व परिसरातील सोयाबीनवर सध्या हळद या रोगाचा प्रादुर्भाव दिसत असून, या रोगामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. येरोळ व परिसरात ३० टक्के सोयाबीनमध्ये घट येणार हे निश्चित असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शासन आणि विमा कंपनीने संयुक्तपणे पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी येरोळ परिसरातून शेतकरी करीत आहेत.
बसेस सुरू करण्याची नागरिकांची मागणी
लातूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शहरी भागातील बसेस सुरू करण्यात आल्या आहेत. त्याच धर्तीवर ग्रामीण भागात बसेस सुरू करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. मुक्कामी बसेस बंद असल्याने विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यातच डिझेलचे दर वाढल्याने एसटी महामंडळाला अडचणींचा सामना करावा लागत असून, उत्पन्नही घटले आहे. दरम्यान, प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसेस सुरू केल्या जात असल्याचे लातूर महामंडळाच्या वतीने सांगण्यात आले. ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी बसेस सुरू करण्याची मागणी होत आहे.
पिकांचे पंचनामे करून मदत द्या
लातूर : जिल्ह्यात मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी साचल्याने पिके पिवळी पडत असून, उत्पादनात घट होणार आहे. दरम्यान, खरिपाच्या मध्यंतरी पावसाने उघडीप दिली होती. आता समाधानकारक पाऊस झाला असला तरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.
जिल्ह्यातील प्रकल्पांत मुबलक पाणीसाठा
लातूर : जिल्ह्यात समाधानकारक पावसामुळे लघु, मध्यम साठवण तलावात मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाला आहे. रेणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, रबी हंगामातील पिकांना या पाण्यामुळे मदत होणार आहे. मसलगा, व्हटी, तिरू, देवर्जन, रेणा आदी प्रकल्पांत मुबलक प्रमाणात पाणीसाठा झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५५० मिमीहून अधिक पाऊस झाला असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.