शेतावर कामास येत नसल्याच्या रागातून मजूर महिलेची कुऱ्हाडीने वार करून हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 14:35 IST2020-09-16T14:34:06+5:302020-09-16T14:35:11+5:30
तुम्ही आमच्या शेतात कामाला का येत नाही, असे दोन महिलांना धमकावले

शेतावर कामास येत नसल्याच्या रागातून मजूर महिलेची कुऱ्हाडीने वार करून हत्या
मुरूड (जि़ लातूर) : आमच्या शेतात कामाला का येत नाहीस म्हणून आरोपी विनायक सौदागर जाधव याने कुऱ्हाडीने घाव घालून लातूर तालुक्यातील ढाकणी येथील रेखा विठ्ठल सवई या महिलेचा खून केला. ही घटना ढाकणी येथे सोमवारी सायंकाळी घडली़ याप्रकरणी तिघांविरुद्ध सोमवारी रात्री उशीरा मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
ढाकणी शिवारातून रेखा सवई व कांताबाई सुरवसे या दोन महिला आपली जनावरे घेऊन सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गावाकडे परतत होत्या़ त्याच वेळेस आरोपी विनायक सौदागर जाधव हा तिथे हातात कुऱ्हाड घेऊन आला. त्याने या दोन्ही महिलांना धमकावले. तुम्ही आमच्या शेतात कामाला का येत नाही, असे तो म्हणाला. तसेच जुन्या भांडणाची कुरापत काढून त्याने शिवीगाळही केली. त्याच वेळेस आलेल्या सचिन सुरवसे व अभिमान सुरवसे या दोघांनीही तुला जीवे मारायला सांगितले आहे, असे म्हणत आरोपीने रेखा विठ्ठल सवई यांच्या मानेवर हातातील कुऱ्हाडीने वार केले. त्यात सदरील महिला जागीच गतप्राण झाली़
याप्रकरणी कांताबाई सुरवसे यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विनायक जाधव, सचिन सुरवसे, अभिमान सुरवसे या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी एस़बी़ सांगळे करीत आहेत.