सणासुदीच्या दिवसात संपूर्ण येरोळ गाव चाचपडतोय अंधारात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:34+5:302021-09-13T04:19:34+5:30
लाईट व्यवस्थित न दिल्यास येथील महावितरणच्या उपकेंद्रास टाळे लावले जाईल असा इशारा उपसरपंच सतीश सिंदाळकर व ग्रामस्थांनी दिला आहे. ...

सणासुदीच्या दिवसात संपूर्ण येरोळ गाव चाचपडतोय अंधारात !
लाईट व्यवस्थित न दिल्यास येथील महावितरणच्या उपकेंद्रास टाळे लावले जाईल असा इशारा उपसरपंच सतीश सिंदाळकर व ग्रामस्थांनी दिला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. पण महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे वीज वारंवार खंडित होत असल्याचे प्रकार घडत आहेत. पिण्याचे पाणी मिळणेही मुश्कील झाले आहे. तसेच वेगवेगळे उद्योग असणाऱ्या दुकानदार व व्यावसायिकांचीही अडचण झाली आहे. एकूणच, सर्व कामकाजावर विपरीत परिणाम होत आहेत. महावितरण अधिकाऱ्यांच्या नियोजनाअभावी लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. ग्राहकांसमोर मोठ्या समस्या उभ्या ठाकल्या आहेत.
उपकेंद्रात कायमस्वरूपी अधिकारी व लाईनमन नसल्यामुळे हे उपकेंद्र समस्यांचे माहेरघर बनले आहे. प्रभारी अधिकाऱ्यावर कामकाज सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी या गावाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत आहेत. त्वरित गावातील समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असे भाजपाचे तालुकाध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले.
आमच्या उद्योगावर परिणाम होत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिक व व्यावसायिकांना त्रासास सामोरे जावे लागत असल्याने महावितरणने ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. - विश्वनाथ नल्ले
नवीन ट्राॅन्सफाॅर्मर बसविणार...
येरोळ येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रावर क्षमतेपेक्षा जास्त लोड येत असल्याने वारंवार ट्रान्सफार्मर जळत आहेत. नवीन ट्राॅन्सफाॅर्मर बसविण्यात येत असून सुरळीत वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे कनिष्ठ अभियंता जी.एस. गिरी यांनी सांगितले.