घरणी कालवा सिंचनाचा ६०० हेक्टर्सवरील उसाला फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:16 IST2021-05-28T04:16:02+5:302021-05-28T04:16:02+5:30
एस.आर.मुळे शिरूर अनंतपाळ : घरणी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील उसासह रबी पिके जगविण्यासाठी आजपर्यंत दोन आवर्तन ...

घरणी कालवा सिंचनाचा ६०० हेक्टर्सवरील उसाला फायदा
एस.आर.मुळे
शिरूर अनंतपाळ : घरणी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे उन्हाळी हंगामातील उसासह रबी पिके जगविण्यासाठी आजपर्यंत दोन आवर्तन पूर्ण आले आहेत. मंगळवारपासून तिसरे आवर्तन सुरू झाले आहे. त्यामुळे घरणी धरणाच्या कालवा सिंचनाचा ६०० हेक्टर्स मधील उसाला लाभ झाला असून, तिसऱ्या आवर्तनात दोन्ही कालव्याद्वारे १.५० दलघमी पाण्याचा विसर्ग होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.
मागील वर्षी घरणी मध्यम प्रकल्प शंभर टक्के भरला होता. त्यामुळे घरणी धरणाच्या पाणीसाठ्याचा तालुक्यातील शेतकऱ्यांना चांगला लाभ व्हावा म्हणून येथील पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता गोरख जाधव यांनी उपविभागीय कार्यालयातील स्टाफच्या मदतीने उन्हाळी हंगामातील पिकांना कालवा सिंचनाचा भरघोस लाभ देण्यासाठी सिंचन वेळापत्रकाचा कृती आराखडा आखला. त्यानुसार धरणातील ७.८२० दलघमी उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून त्याच्या अंमलबजावणीसाठी कालवा सिंचनाचे तीन आवर्तने निश्चित करण्यात आली. यासाठी राजेंद्र पांचाळ, संतोष म्हैशेवाड, एस.पी केजकर, गोविंदराव मोरे यांच्या नेतृत्वातील सिंचन पथक स्थापन करण्यात आले. सिंचन पथकाने आजपर्यंत दोन आवर्तन पूर्ण केले आहेत. मंगळवारपासून तिसरे आवर्तन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कालवा सिंचनाचा तालुक्यातील ६०० हेक्टर्स मधील पिकांना लाभ झाला आहे.
धरणाच्या साठ्यावर ४५० हेक्टर्स ऊस....
घरणी मध्यम प्रकल्प असल्याने धरणाचा पाणीसाठा मोठा आहे. मागील वर्षी घरणी धरण शंभर टक्के भरले होते. त्यामुळे साठ्यातील पाण्याचा लाभ घेऊन अनेक गावातील शेतकऱ्यांनी ४५० हेक्टर्स मध्ये उसाची लागवड केली आहे. तर धरणाच्या दोन्ही कालवा सिंचनाद्वारे १५० हेक्टर्स ऊस अशा एकंदर ६०० हेक्टर्सला कालवा सिंचनाचा लाभ झाला आहे.
पाण्याचा काटकसरीने वापर करावा....
घरणी धरणात आता केवळ ५.१९७ दलघमी एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. तरीही पाटबंधारे विभागाने तिसरे आवर्तन सुरू केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यानी थकीत पाणीपट्टी भरुन तिसऱ्या आवर्तनातील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन उपविभागीय अभियंता गोरख जाधव यानी केले आहे.
आठवडाभर आवर्तन चालणार....
घरणी धरणाच्या पाणीसाठ्यावर ४५० हेक्टर्स तर दोन्ही कालव्यावर १५० हेक्टर्स असा एकंदर ६०० हेक्टर्सवर ऊस असून, उसाच्या पिकाला अधिकचे पाणी लागते. त्यामुळे उजव्या कालव्यातून २५ क्यूसेक्स तर डाव्या कालव्यातून २० क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत असून सदरील आवर्तन आठवडाभर चालणार असल्याचेही उपविभागीय अभियंता गोरख जाधव यांनी सांगितले.