डीओसीच्या आयातीमुळे सोयाबीनचे दर कोसळले- भाग १
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST2021-09-25T04:19:37+5:302021-09-25T04:19:37+5:30
लातूर : आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये सोयाबीनचा दर १० हजार २१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा ...

डीओसीच्या आयातीमुळे सोयाबीनचे दर कोसळले- भाग १
लातूर : आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच ऑगस्टमध्ये सोयाबीनचा दर १० हजार २१ रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचला होता. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्या होत्या; मात्र, प्रत्यक्षात सोयाबीनच्या राशीस सुरुवात होऊन शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी येण्यास सुरू झाल्यानंतर केंद्र सरकारच्या सोयाबीन डीओसीच्या आयातीच्या धोरणांमुळे राज्यातील बाजारपेठेतील दरात अडीच हजारांपेक्षा अधिक रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले आहे.
देशात गेल्यावर्षीपर्यंत सर्वाधिक सोयाबीनचे उत्पादन मध्यप्रदेशात घेतले जात होते; मात्र यंदा सोयाबीनला हमीभावापेक्षा अडीचपट अधिक दर मिळाल्याने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीनकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात पेरा वाढला आणि राज्यातील प्रमुख पीक बनले. सुरुवातीस निसर्गानेही साथ दिल्याने भरघोस उत्पादन होईल आणि भावही चांगला मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. गेल्या तीन आठवड्यांपासून सोयाबीनच्या राशींना सुरुवात झाली असून, शेतकरी आपला शेतमाल बाजारपेठेत विक्रीसाठी आणत आहेत; परंतु राज्यातील प्रमुख बाजार समित्यांपैकी असलेल्या लातूरसह अन्य बाजारपेठांत दर गडगडले आहेत. शुक्रवारी कमाल भाव ७ हजार ६५१, किमान ५ हजार ८७१ तर सर्वसाधारण दर ७ हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे. सध्या लातूरच्या बाजारपेठेत १० हजार ६५० क्विंटलपर्यंत आवक होत असून, आगामी काळात ती वाढणार आहे. त्यामुळे आणखीन दरात घसरण होण्याची शक्यता आहे.
चुकीच्यावेळी डीओसी आयात...
गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येऊन जानेवारी- फेब्रुवारीत जवळपास २५ ते २८ टक्के डीओसी निर्यात करण्यात आली. त्याचा परिणाम देशात होऊन काही महिन्यांतच तुटवडा जाणवू लागला. त्यामुळे दरात वाढ होण्यास सुरुवात झाली. पोल्ट्री व्यावसायिकांच्या काळजीपोटी केंद्र सरकारने १५ लाख टन जीएम सोयाबीन आयातीचे धोरण स्वीकारले आणि आयातीची वेळ चुकली. दरम्यान, याच कालावधीत देशातील सोयाबीन बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली. विदेशातून येणाऱ्या सोयाबीनला ५ हजार ५०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत भाव असल्याने स्थानिक बाजारपेठांत सोयाबीनचे दर गडगडले आहेत, असे सोयाबीन खरेदी- विक्री करणाऱ्या तज्ज्ञ व्यापाऱ्यांनी सांगितले.
वर्ष कसे काढावे, ही चिंता...
मला १० एकर शेती असून, ७ बॅग सोयाबीनची पेरणी केली होती. मध्यंतरी पावसाचा खंड आणि त्यानंतर सततच्या पावसामुळे उतारा ५० टक्क्यांनी घटला. अशा परिस्थितीत चांगल्या दरामुळे काही तरी पदरी पडेल, अशी आशा होती; परंतु दर कोसळल्याने संकट निर्माण झाले आहे. वर्ष कसे काढावे, अशी चिंता लागली आहे.
- मधुकर बिरादार, शेतकरी, तगरखेडा.