आषाढी वारीवर निर्बंध; विश्व हिंदू परिषद करणार आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:25+5:302021-07-15T04:15:25+5:30
आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अगदी निजाम राजवटीतही वारी सुरूच होती. वारीला ...

आषाढी वारीवर निर्बंध; विश्व हिंदू परिषद करणार आंदोलन
आषाढी वारी हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. अगदी निजाम राजवटीतही वारी सुरूच होती. वारीला कोणतीही आडकाठी नव्हती. सध्या राज्यात असणाऱ्या तीन पक्षांच्या सरकारने मात्र वारीवर निर्बंध घातले आहेत. हा निर्णय चुकीचा आहे. सरकारच्या या निर्णयाचा विश्व हिंदू परिषद निषेध करीत असल्याचे ते म्हणाले. देशपांडे म्हणाले, कोरोनाविषयक नियम पाळून मर्यादित संख्येत आम्ही पंढरपूरला जाण्याची तयारी दर्शवली होती. वारी २० दिवसांऐवजी १० दिवस करावी. गरज असेल तर केंद्रीय पोलीस बल मागवावे. दिवसा वारीमुळे संसर्गाचा धोका असेल तर रात्रीच्या वेळी जाण्याची परवानगी द्यावी. मुक्काम गावाबाहेर करण्यासह आणखी काही नियमांचे पालन करीत वारीला आम्ही परवानगी मागितली होती; पण सरकार तयार झाले नाही.
संत निवृत्तीनाथ महाराज, संत ज्ञानदेव महाराज, संत सोपानदेव महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांसह इतर संतांच्या पालख्याही पंढरपुरात येत असतात. या दिंड्यांसह किमान दोन वारकऱ्यांना जाण्यास परवानगी द्यावी. प्रत्येकाची आरटीपीसीआर चाचणी करून घ्यावी. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या वारकऱ्यानांच सहभागी होऊ द्यावे, अशीही मागणी त्यांनी केली. सरकारने वारीला परवानगी नाकारल्यामुळे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने १६ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भजन आंदोलन केले जाणार आहे. त्यानंतरही सरकारने परवानगी दिलीच नाही तर आषाढी एकादशीच्या दिवशी प्रत्येक गावात एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. गाव हेच पंढरपूर आणि झाड हाच पांडुरंग असे समजून झाडाच्या स्वरूपातील विठ्ठलाची पूजा प्रत्येक गावातील वारकरी करतील, असेही यावेळी सांगण्यात आले. पत्रकार परिषदेला महानगराध्यक्ष बालाजीराव गवळी, हभप भरत भिंगोलीकर महाराज, हभप बाबू महाराज शिवलकर, वासुदेवाचार्य कमठाणकर, गौरीशंकर कौळखेरे यांची उपस्थिती होती.