बॅंकेचे खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:19 IST2021-09-13T04:19:28+5:302021-09-13T04:19:28+5:30
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यात १ ते ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी ...

बॅंकेचे खाते उघडण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ
प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच विद्यार्थ्यांची पटनोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढविण्यासाठी राज्यात १ ते ५ वी च्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. केंद्र व राज्य शासनाच्या शाळा, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित शाळा, वस्तीशाळा, महात्मा फुले शिक्षण हमी योजना केंद्रे या शाळांतील विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळतो. दोन वर्षांपासून कोरोनामुळे प्राथमिक शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांना तीन चार महिन्यांचे तांदूळ कोरोना नियमांचे पालन करून वाटप केले जात होते. पण १ सप्टेंबर रोजी शासनाने उन्हाळी सुटीतील शालेय पोषण आहाराचे पैसै थेट विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता विद्यार्थ्यांची बॅंक खाते उघडण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.
१ ली ते ५ वी च्या विद्यार्थ्यांना १५० रु तर ६ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांना २५० रुपये खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे. पण खाते उघडण्यासाठी त्यापेक्षा जास्तीचे पैसे लागत असल्याची चर्चा पालकांतून होत आहे. दरम्यान, केंद्रप्रमुख काशिम शेख म्हणाले, विद्यार्थ्यांचे खाते उघडण्यासाठी सांगितल्याने पालकांना कळविले आहे.
महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेचेच पासबुक
हाळी हंडरगुळी येथे जिल्हा बॅंक व महाराष्ट्र ग्रामीण बँक अशा दोन बॅंकांच्या शाखा आहेत. पण केवळ ग्रामीण बॅंकेचेच पासबुक लागते असे सांगितले जात असल्याने गर्दी होत आहे. बॅंक खाते उघडण्यासाठी बॅंकेऐवजी बॅंकेच्या सेवा केंद्रावर जावे लागत आहे. त्यामुळे सेवा केंद्र चालकांची मनमानी होत असून खाते काढण्यासाठी जास्तीचे पैसे घेतले जात असल्याचे काही पालकांनी बोलून दाखवले.