परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:19+5:302021-05-01T04:18:19+5:30
सक्षम फाऊंडेशनच्यावतीने रक्तदान शिबिर लातूर : शहरात सक्षम फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना ...

परजिल्ह्यातून येणाऱ्या वाहनांची तपासणी
सक्षम फाऊंडेशनच्यावतीने रक्तदान शिबिर
लातूर : शहरात सक्षम फाऊंडेशनच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५१ जणांनी रक्तदान केले. यावेळी रक्तदात्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन संभाजी कांबळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी शंकर लांडगे, शिवानंद जाधव, शुभम जाधव, हरिश कांबळे, योगेश नाईकवाडे, लखन नरके, योगेश कोंबडे, योगेश खानापूर, प्रा. अविनाश भोसले यांची उपस्थिती होती. या शिबिरात विविध सामाजिक संस्थांचा सहभाग होता. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत शिबिर पार पडले.
कोरोना रुग्णांसह नातेवाईकांना मोफत भोजन
लातूर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, कोविड केअर सेंटर तसेच खासगी रुग्णालयात उपचार घेणा-या रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात असलेल्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांना व नातेवाईकांना खा. सुधाकर श्रृंगारे यांच्यावतीने मोफत भाेजन देण्यात आले. यशस्वितेसाठी उद्धव लामतुरे, निखिल गायकवाड, बाबा कांबळे, अक्षय धावारे, अमोल कदम, आकाश जाधव, लखन सुरवसे, रवी सूर्यवंशी आदींसह तालुकानिहाय पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.
बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक
लातूर : उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतीमालाची आवक होत आहे. सोयाबीन, गहू, ज्वारी, तूर, हरभरा, चिंच, चिंचोका आदी मालाची आवक होत आहे. कोरोनाच्या संकटामुळे बाजार समिती प्रशासनाच्यावतीने शेतीमालाची वाहने आणि व्यापा-यांच्या वाहनासाठी विशिष्ट वेळ ठरवून देण्यात आली आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर आदी नियमांचे पालन करीत व्यवहार पार पडत आहेत. दरम्यान, शुक्रवारी सोयाबीनला ७०००, तर हरभऱ्याला ५०३० रुपयांचा सर्वसाधारण दर मिळाला असल्याचे बाजार समितीच्यावतीने सांगण्यात आले.
लातूर शहरात सुगंधी तंबाखूची विक्री
लातूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यातच पानटपऱ्या बंद आहेत. मात्र, अनेक भागात सुगंधी तंबाखूची चोरट्या पद्धतीने विक्री केली जात आहे. याकडे अन्न आणि औषध प्रशासन तसेच पोलिसांचे दुर्लक्ष आहे. अनेक ठिकाणी चोरट्या मार्गाने सुगंधी तंबाखूची विक्री होत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देऊन विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
सामाजिक संस्थांच्यावतीने कीटचे वाटप
लातूर : शहरासह जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विविध सामाजिक संस्थांच्यावतीने गरजूंना अन्नधान्य कीटचे वाटप केले जात आहे. कीटमध्ये गहू, तांदूळ, तेल, मीठ, तिखट आदींचा समावेश असून, या उपक्रमामुळे गरजुंना आधार मिळाला आहे. दरम्यान, यासोबतच सामाजिक संस्थाच्यावतीने रुग्णालय परिसरात असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना सकाळ आणि सायंकाळचे भोजन दिले जात असल्याचे चित्र आहे.
शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत वाढ
लातूर : शहरासह ग्रामीण भागात दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे. लातूर शहरासह ग्रामीण भागात घरासमोर पार्किंग केलेल्या दुचाकी चोरीला गेल्याचा घटना दररोज घडत आहेत. जिल्हाभरात दररोज किमान चार ते पाच दुचाकी चोरीच्या तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये केल्या जात आहेत. मात्र, तक्रार दाखल केल्यानंतर दुचाकीचा सुगावा लागत नसल्याचे चित्र आहे. याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
शाळांच्यावतीने ऑनलाईन उन्हाळी वर्ग
लातूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद आहेत. त्यामुळे विविध शाळांच्यावतीने दहावीचे उन्हाळी वर्ग ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आले आहेत. सकाळ आणि सायंकाळच्या सत्रात वर्ग होत असून, विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे प्रमाण समाधानकारक आहे. शाळा बंद असल्याने ऑनलाईन उपक्रमाला गती देण्यात आली आहे. जिल्ह्यात जवळपास ३४ हजारांहून अधिक विद्यार्थी नववी उत्तीर्ण होऊन दहावीच्या वर्गात जाणार आहेत. या उपक्रमाचे पालकांतून कौतुक होत आहे.