औराद शहाजानी परिसरातील शेकडाे एकरावरील भाजीपाला मातीमाेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:20 IST2021-03-17T04:20:06+5:302021-03-17T04:20:06+5:30
शेतकऱ्यांचा माल महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात विक्रीसाठी पाठविला जाताे. तेथील बाजार दरही कोसळले आहेत. ...

औराद शहाजानी परिसरातील शेकडाे एकरावरील भाजीपाला मातीमाेल
शेतकऱ्यांचा माल
महाराष्ट्रासह शेजारच्या कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्यात विक्रीसाठी पाठविला जाताे. तेथील बाजार दरही कोसळले आहेत. बाजारपेठेत नेलेल्या फळ आणि भाजीपाल्याचे वाहनभाडेही शेतकऱ्यांना पदरमाेड कारुन द्यावे, लागत आहे. भाजीपाला आणि फळबाग कच्चामाल असल्याने शेतात साठवून ठेवणेही शक्य नाही. त्यामुळे शेतात एकतर सडवने आणि दुसरा पर्याय कवडीमोल दरात बाजारपेठेत विक्री करणे आहे. याशिवाय इतर पर्याय शेतकऱ्यांच्या हातात नसल्याने आर्थिक काेंडी झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी कोराेना काळात देशाची आर्थिक घडीचा विकासदर कायम ठेवण्यासाठी हातभार लावल. आता त्याच शेतकऱ्याची अवस्था वाईट झाली आहे. बाजारपेठ बंद-सुरु, आठवडी बाजार बंद, हाॅटेल रेस्टाॅरंटही माेजक्याच वेळी सुरु आणि बंद हाेत असल्याने व्यवसाय आणि उलाढालीवर परिणाम झाला आहे. यंदा चांगला पाऊस झाला आहे. परतीच्या पावसाने शेतशिवारात जलसाठाही समाधानकारक झाल्याने लागवड वाढली आहे. परिणामी, शेकडो एकर शेतावरील खरबूज, टरबूज, पपई, द्राक्ष फळबागांसह भाजीपालामध्ये वांगे, टोमॅटो, शिमला, कोथिंबीर, दोडका, पत्तागोबी, फुलगाेबी, चवळी, वरणा, कांदा, बटाटे आदी पिके आज बाजारभाव पडल्याने शेतात जाग्यावरच कुजत आहेत. मजुरीचे भाव वाढले असून, वाढत्या इंधन दरवाढीमुळे बाजारपेठेत पुरवठा करणाऱ्या वाहनांचे भाडेही वाढले आहे.
वाहतुकीच्या वाहनभाड्यात झाली वाढ...
शेतकऱ्यांचा मालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी शेतातच टाकून देत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आठवडी बाजार सुरु करण्याची मागणी हाेत आहे. वाढत्या कराेणामुळे जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजारावर बंदी घातली असून, सदर आठवडी बाजार भाजीपाला पिकासाठी सुरु करावा, सोशल डिस्टंसिंग आणि शासकीय नियमांचे पालन करुन आम्ही तो बाजार चालवू, असे व्यापारी मिनाज बागवान म्हणाले. सदर बाजार बाजारपेठ प्रशासनाने काही वेळेत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शेतकरी विठ्ठल अंचुळे यांनी केली आहे.
बाजारातील भाजीपाला दर...
सध्याला भाजीपाल्याचे दर काेसळले आहेत, यामध्ये वांगे ५ रुपये किलो, शिमला १० ते १५ रुपये किलाे, मिरची १० ते १५ रुपये, टोमॅटो २ रुपये किलो, शेवगा २० रुपये, कोथिंबीर ५ ते १० रुपये, फूलगोबी दोन ते अडीच रुपये किलाे, पत्तागाेबी २ रुपये, चवळी १० रुपये, वरणा १० रुपये, कांदे १२ ते १५ रुपये, बटाटे ५ ते १२ रुपये किलाे, लसून २५ ते ४० रुपये किलो असे दर आहेत. आगामी काळात या भाजीपाल्याचे दर आणखीन काेसळणार असल्याचे शेतकऱ्यांतून सांगितले जात आहे. एकीकडे बाजार बंद असल्याने, ग्राहक, खरीदार व्यापारीच फिरकत नसल्याचे चित्र सध्याल आहे. शिवाय, हॉटेल आणि रेस्टॉरंटची मागणी मोठ्या प्रमाणात घटली आहे.
उभ्या पिकावर नांगर फिरवण्याची वेळ...
निलंगा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बाजारातील मागणीच घटल्याने शेतातील भाजीपाल्यावर नांगर फिरविण्याची वेळ आली आहे. काही शेतकरी नांगर फिरवून हा भाजीपाला माेडून काढत आहेत. औराद येथील शेतकरी देवराव म्हेत्रे म्हणाले, मी फूलगोबी दीड एकरावर घेतली आहे. सदर फुलगाेबीची विक्रीच हाेत नसल्याने शेतातच मोडून टाकली आहे. या फुलगाेबीवर रोटावेटर फिरावला आहे. तर तगरखेडा येथील शेतकरी भागवत बिरादार म्हणाले, दोन महिन्यापासून टोमॅटोचे दर कोसळले आहेत. या रब्बी हंगामात सतत भाव पडल्याने उत्पादन खर्चही निघाला नाही. आता तार आणि काठी काढणे याचा खर्चही निघालेला नाही. टरबूज उत्पादक शेतकरी जमीर मुल्ला म्हणाले, दोन रुपये, तीन रुपये किलो भावाप्रमाणे टरबूज विक्री करण्याची वेळ आली आहे. फळबाजारातील भाव घसरल्याने टरबूज बाजारात नेऊन विक्री करणे परवडत नाही. यातून वाहतुकीचा खर्चही पदरी पडत नाही.